Saturday, August 2, 2025

सोसायटीला ५० लाखांचा गंडा

सोसायटीला ५० लाखांचा गंडा

क्राइम : अ‍ॅड. रिया करंजकर


एनओसी म्हणजे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट याचाच अर्थ कोणालाही काही हरकत नाही. हे सर्टिफिकेट प्रत्येक ठिकाणी कामानिमित्त लोकांना उपयोगी पडतं. ते नसेल तर अनेक कामे रखडली जातात आणि त्याच्यामुळे अनेकांचे लाखोंचे नुकसान होते. हे सर्टिफिकेट नसल्यामुळे अनेक कामं रखडली जातात.


असाच एक किस्सा रितेश ज्या सोसायटीमध्ये राहत होता त्या सोसायटीच्या बाबतीत झाला होता. रितेशने नवीन फ्लॅट घ्यायचं ठरवलं होतं. म्हाडाने एक स्कीम काढली होती. त्यामध्ये ठरलेल्या महिन्याच्या आत रूम घेतली तर ती आपल्याला कमी बजेटमध्ये मिळेल, म्हणून रितेशने नवीन रूम घ्यायची ठरवली. अगोदर एक रूम त्याच्याकडे असल्यामुळे नवीन रूम घेतल्यावर इन्व्हेस्ट होऊन जाईल. त्यामुळे टॅक्स भरायचा वाचेल. रूम घेण्यासाठी रितेशने कायदेशीर प्रक्रिया केली. अर्धी रक्कम ठरल्याप्रमाणे रितेशने रूम मालकाला दिली. पुढच्या रकमेसाठी त्याला कर्ज घ्यायचे होते. त्यासाठी रितेशने नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेटसाठी अर्ज केला. रितेशचा याआधीच्या रूमची कोणतीही थकबाकी नव्हती. त्याने सर्व आर्थिक बाबी पूर्ण केल्या होत्या. त्यामुळे रितेशला रूम विकत घेण्यासाठी सोसायटीचे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट पाहिजे होते. जेणेकरून ते प्रमाणपत्र तो बँकेला देऊन रूमच्या बाबतीत जे काही आर्थिक व्यवहार असतील ते पूर्ण करता येतील. परंतु सोसायटीच्या मेंबर्सनी ना हरकत प्रमाणपत्र देताना दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी घेतला. त्यामुळे बँकेत ते प्रमाणपत्र देताना खूप वेळ झाला. त्यामुळे मिळालेले कर्ज पूर्ण होईपर्यंत खूप वेळ गेल्यामुळे म्हाडाकडून जी योजना मिळणार होती त्या योजनेचा फायदा रितेशला मिळणार नव्हता. त्यामुळे रितेशला सोसायटीने ना हरकत प्रमाणपत्र न दिल्यामुळे सोसायटीच्या विरुद्ध केस दाखल केली. सोसायटीने मला नुकसानभरपाई म्हणून ५० लाख रुपये द्यावेत अशा प्रकारची केस त्याने सोसायटीविरुद्ध कोर्टामध्ये केली.


ज्यावेळी ही पूर्ण केस सोसायटीच्या वकिलांकडे आली, त्यावेळी बँकेच्या सर्व आर्थिक बाबींचा विचार करण्यात आला. म्हाडाच्या योजनेचा विचार केला गेला. त्यावेळी असं जाणवलं की, ज्या बँकेतून हे कर्ज घेतलं त्या बँकेला एनओसीची काहीच गरज नव्हती. सोसायटीकडून एनओसी मिळण्याच्या अगोदरच त्याला बँकेकडून कर्ज मंजूर झालं होतं. मग त्याचं आर्थिक नुकसान कसं आणि का झालं की जेणेकरून त्याने ५० लाखांचा दावा सोसायटीवर केला होता.


म्हाडाची जी योजना होती चालू होती. त्यामध्येच त्याचं बँकेकडून कर्ज मंजूर झालं होतं. मग रितेशने असं का केलं. त्याचा ठपका त्याने सोसायटीवर का लावला? सोसायटीने एनओसी द्यायला फारच उशीर केला होता ही गोष्ट सोसायटीला मान्य होती, पण त्याच्या चुकीमुळे ५० लाख सोसायटीला दंड भरायला लागणार होता.


सोसायटीच्या काही मेंबर्समुळे अनेक अडचणींना रहिवाशांना सामोरे जावं लागतं आणि केव्हा केव्हा सोसायटीच्या अति शहाण्या मेंबरमुळे सोसायटीला आर्थिक दंड सोसावा लागतो. कारण रितेशने रूम घेतला होता त्या अगोदरच्या मालकाचे कोणत्याही आर्थिक बाबी सोसायटीमध्ये थकबाकीत नव्हते. सोसायटीने एनओसी द्यायला उशीर केल्यामुळे या एकाच कारणामुळे सोसायटीला कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागणार होत्या. आता हा दावा न्यायालयामध्ये चालू आहे. त्यामध्ये अति शहाण्या मेंबरमुळे विनाकारण सोसायटी फसली होती.
(सत्यघटनेवर आधारित)

Comments
Add Comment