Saturday, August 2, 2025

'द केरळ स्टोरी'ला राष्ट्रीय पुरस्कार! केरळचे मुख्यमंत्री संतापले

'द केरळ स्टोरी'ला राष्ट्रीय पुरस्कार! केरळचे मुख्यमंत्री संतापले

अदा शर्माच्या 'द केरळ स्टोरी' चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन नाराज


केरळ: अभिनेत्री अदा शर्माच्या 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन आणि छायांकन श्रेणीत राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. मात्र या बातमीमुळे केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन (Pinarayi Vijayan) हे प्रचंड नाखूष असल्याचे दिसून आले आहे. 'द केरळ स्टोरी' ला मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्काराबद्दल त्यांनी कडवट शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली आहे.


दिनांक १ ऑगस्ट रोजी ७१ व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. अनेक बॉलिवूड चित्रपटांनी या प्रतिष्ठित पुरस्काराचा सन्मान मिळवला आहे. त्यामध्ये अभिनेत्री अदा शर्माच्या 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन आणि छायांकन श्रेणीत राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. मात्र या बातमीमुले केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन चांगलेच संतापले आहेत. हा चित्रपट खोट्या माहितीवर आधारित असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.



द केरळ स्टोरीला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल का आहे केरळचे मुख्यमंत्री?


राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये 'द केरळ स्टोरी' चित्रपटाची वर्णी लागताच, केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, 'या वर्षीचे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाले, त्यात मल्याळम चित्रपटाने मोठी कामगिरी केली. उर्वशी आणि विजयराघवन यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचे पुरस्कार मिळाले. दोघांनीही त्यांच्या अद्वितीय प्रतिभेने मल्याळम चित्रपटसृष्टी समृद्ध केली आहे. मला आशा आहे की हे पुरस्कार मल्याळम चित्रपटाला अधिक उत्कृष्ट चित्रपटांसह नवीन उंची गाठण्यास प्रेरित करतील.'


ते पुढे म्हणाले की, 'मात्र, केरळला बदनाम करण्यासाठी आणि सांप्रदायिकता पसरवण्यासाठी खोट्याच्या आधारे बनवलेल्या चित्रपटाला पुरस्कार देऊन, राष्ट्रीय पुरस्कार ज्युरीने धार्मिक बंधुता आणि राष्ट्रीय एकतेसाठी उभ्या असलेल्या भारतीय चित्रपटाच्या महान परंपरेचा अपमान केला आहे. याद्वारे, ते सांप्रदायिक अजेंडा राबविण्यासाठी चित्रपटाला शस्त्र बनवण्याच्या संघ परिवाराच्या अजेंडाची अंमलबजावणी करत आहेत. आम्ही याचा तीव्र निषेध करतो. प्रत्येक मल्याळी आणि देशातील सर्व लोकशाहीवादी श्रद्धावानांनी या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. सांप्रदायिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी कलेचा शस्त्र म्हणून वापर करणाऱ्या राजकारणाविरुद्ध आपण एकत्र आले पाहिजे.'



'द केरळ स्टोरी' ला विरोध का?


'द केरळ स्टोरी' हा चित्रपट सुदीप्तो सेन यांनी दिग्दर्शित केला आहे. अभिनेत्री अदा शर्माने यात मुख्य भूमिका साकारली होती. २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात केरळमधील तीन महिला नर्सच्या जीवनावर आधारित आहे, ज्या लव्ह जिहादला बळी पडतात आणि त्यानंतर त्यांच्यासोबत काय भीषण घडत जाते, ते दाखवण्यात आले आहे. या चित्रपटाने देशभरात चांगलाच गल्ला जमवला होता, पण केरळमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला नव्हता.

Comments
Add Comment