
नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा आला आहे. या वर्षी १६ जुलै रोजी सायना नेहवालने एक पोस्ट शेअर करत पारुपल्ली कश्यपपासून ती वेगळे होत असल्याचे जाहीर केले होते. पण आता या जोडप्याने यू-टर्न घेतला आहे, सायना नेहवालने २ ऑगस्ट (शनिवार) रोजी एक पोस्ट शेअर करून सांगितले की आम्ही दोघेही पुन्हा एकत्र आलो आहोत.
सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप हे दोघं लहानपणापासूनचे चांगले मित्र आहेत, या दोघांनीही त्यांच्या बॅडमिंटन कारकीर्दमध्ये स्वतःची मोहर उमटवली. त्यानंतर या दोघांनी लग्न केले. मात्र लग्नाच्या ७ वर्षानंतर आम्ही वेगळं होत असल्याचे या जोडप्याने सोशल मीडियावर जाहीर केले होते. ज्यामुळे या जोडीचे चाहते नाराज झाले, मात्र सायना नेहवालने केलेल्या या नव्या पोस्टमुळे या जोडीचे चाहते पुन्हा एकदा सुखावले आहेत,
वेगळे होण्याच्या निर्णयापासून १७ दिवसांत घेतला यू-टर्न
सायना आणि पी. कश्यपने अवघ्या १७ दिवसांत त्यांच्या निर्णयापासून यू-टर्न घेतला आहे. सायना नेहवालने इंस्टाग्रामवर पारुपल्ली कश्यपसोबतचा फोटो शेअर केला आणि लिहिले, 'कधीकधी अंतर तुम्हाला उपस्थितीचे महत्त्व शिकवते.' 'आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत.'
सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांची भेट १९९७ मध्ये एका कॅम्प दरम्यान झाली. त्यानंतर दोघांनी हैदराबादमधील पुलेला गोपीचंद बॅडमिंटन अकादमीमध्ये प्रशिक्षण घेतले. हळूहळू दोघांमधील जवळीक वाढत गेली. बराच काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर २०१८ मध्ये सायना नेहवाल आणि पारुपल्ली यांचे लग्न झाले.
सायना नेहवालने पोस्ट शेअर करताच चाहते आणि सहकारी खेळाडूंनी सोशल मीडियावर तिचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली. चाहत्यांना वाटले की जर प्रेम खरे असेल तर ते नक्कीच परत येते.
दोघांची बॅडमिंटन कारकीर्द कशी होती?
सायना नेहवालने लंडन ऑलिंपिकमध्ये (२०१२) भारतासाठी कांस्यपदक जिंकले. त्यानंतर ती २०१५ मध्ये बॅडमिंटन रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचली. भारतातील महिला बॅडमिंटन खेळाडूने ही कामगिरी पहिल्यांदाच केली. दुसरीकडे, २०१० मध्ये दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक जिंकून पारुपल्ली कश्यप प्रसिद्धीच्या झोतात आला. लंडन ऑलिंपिक (२०१२) मध्ये तो उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला. हा पराक्रम करणारा तो पहिला भारतीय पुरुष बॅडमिंटनपटू ठरला. ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत (२०१४) पारुपल्ली कश्यपने सुवर्णपदक जिंकले.