
मुंबई : वसई विरारचे महापालिकेचे महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार यांच्यावर ED नं काही दिवसांपूर्वीच धाड टाकली होती. हे प्रकरण अद्याप ताजं आहे. त्यानंतर वसई-विरार शहर महानगरपालिकेतील नगररचना विभागाचे निलंबित उपसंचालक वाय. एस. रेड्डी यांच्याविरुद्ध बेहिशेबी संपत्तीप्रकरणी अखेर भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. आचोळे पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम १३ (१)(ब) सह १३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तक्रारीवरून करण्यात आली असून, तपासाअंती रेड्डी यांच्याकडे कोट्यवधींची बेहिशेबी मालमत्ता असल्याचे स्पष्ट झाले होते. याअंतर्गत ED ने यापूर्वी वसईतील तसेच हैदराबाद येथील निवासस्थानी छापे टाकून तब्बल २३ कोटी २५ लाख ४० हजार रुपयांचे हिरे-जडजवाहीर आणि ८ कोटी ३२ लाख रुपयांची रोकड हस्तगत केली होती.तपासानुसार, रेड्डी यांनी वसई विरार महानगरपालिकेमध्ये कार्यरत असताना आपल्या पदाचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणात संपत्ती मिळवली होती. त्यांच्याकडे आढळलेली संपत्ती ही त्यांच्या अधिकृत उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा अत्यंत जास्त असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
ही संपत्ती मिळवताना त्यांनी भ्रष्ट मार्गांचा वापर केला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणी पुढील तपास ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस अधीक्षक संजय गोविलकर, उपअधीक्षक दत्ताराम कराडे व तपासी अधिकारी रविंद्र परुळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
तक्रारदाराच्या तक्रारीवरून आणि चौकशीअंती आज दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी अधिकृत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी लवकरच रेड्डी यांच्यावर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.