Friday, August 1, 2025

Pune : दौंडच्या यवत गावात दोन गट आमनेसामने, तणाव शिगेला; पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात!

Pune : दौंडच्या यवत गावात दोन गट आमनेसामने, तणाव शिगेला; पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात!

दौंड : दौंड तालुक्यातील यवत गावात दोन गटांमध्ये उसळलेल्या तणावामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद इतका पेटला की, गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं. व्हॉट्सॲप ग्रृपमध्ये आक्षेपार्ह पोस्ट केल्याने तणाव निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. या तणावामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैणात करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडत परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.



व्हॉट्सॲपवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याने तणाव


दोन्ही गटांकडून एकमेकांच्या घरांवर दगडफेक केली जात आहे. एका तरुणाने व्हॉट्सॲपवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याने हा तणाव निर्माण झाला आहे. काल या ठिकाणी एक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात आमदार गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप हे उपस्थित होते. मात्र हा तणाव अद्यापही कायम आहे. काही ठिकाणी जाळपोळ झाल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुणे पोलिसांची विशेष तुकडी या ठिकाणी दाखल झाली आहे. दौंडचे आमदार राहुल कूल यांनी याबाबत बोलताना सांगितले की, यवतमध्ये गेले दोन तीन दिवस तणावपूर्ण वातावरण होतं. सर्वांशी संपर्क करुन तणाव निवळण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु होते. आता तिथे जमाव जमला आहे, त्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटाही तैणात करण्यात आला आहे. आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत.




पोलीस नेमकं काय म्हणाले?


दरम्यान, यवत गावात आज जी घटना घडली, ती एका सोशल मीडिया स्टेटसमुळे घडली. फेसबुक आणि व्हाट्सॲप स्टेटस लावण्यात आलेला होता. एक तरुणांने हे आक्षेपार्ह स्टेटस लावल्यामुळे हा प्रकार घडला. ज्यावेळी पोलिसांना याबाबतची माहिती मिळाली, त्यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. पोलीस स्टेशनला घेऊन गेले मग नंतर त्याच्यावर कारवाई सुरू केली.


पोलिसांनी गावातील प्रतिनिधींची मीटिंग घेतली होती. परंतु त्यादरम्यान आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. गावात तणाव होता, लोक रस्त्यावर आले होते. मात्र पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. आमची पेट्रोलिंग त्या ठिकाणी चालू होती, ज्या ज्या ठिकाणी काही तणावची परिस्थिती होती, त्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी तणाव दूर केला. आता गावात पूर्णपणे शांतता आहे आणि कुठलाही प्रकारचा जमाव कुठे नाही. पोलीस बंदोबस्त आणि पोलीस पेट्रोलिंग चालू आहे. सर्व नागरिकांनी शांतता राखावी, कायद्याचं उल्लंघन करु नये आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन संदीप गिल यांनी केलं.

Comments
Add Comment