Friday, August 1, 2025

मालेगाव प्रकरणात मोहन भागवतांना धरुन आणण्याचे आदेश होते, ATS अधिकाऱ्याचा सनसनाटी दावा

मालेगाव प्रकरणात मोहन भागवतांना धरुन आणण्याचे आदेश होते, ATS अधिकाऱ्याचा सनसनाटी दावा
मुंबई : विशेष एनआयए कोर्टाने मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सातही आरोपींची सुटका केली. ठोस पुरावे नाही, असे कोर्टाने या प्रकरणात निर्णय देताना सांगितले. आरोपींच्या विरोधात यूएपीए अंतर्गत खटला चालवण्यात आलेला होता. दहशतवादी कारवाई केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. मात्र सबळ पुरावे नसल्यानं न्यायालयानं सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.या प्रकरणी एटीएसचे माजी पोलीस निरीक्षक महिबूब मुजावर यांनी अनेक सनसनाटी दावे केले आहेत. पहिल्यांदाच माध्यमांसमोर आलेल्या मुजावर यांनी अतिशय गंभीर आरोप केले आहेत.

मालेगाव येथे २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील साक्षीदार महिबूब मुजावर यांनी माध्यमांसमोर येऊन अनेक खळबळजनक गौप्यस्फोट केले. रामजी कलसांग्रा, संदीप डांगे आणि दिलीप पाटीदार यांचा खून करण्यात आलेला असताना ते जिवंत आहेत म्हणून दोषारोप ठेवण्यात आले. तपास करण्याची जबाबदारी माझ्याकडे दिली होती. जे मेलेले आहेत, ते जिवंत आहेत हे दाखवण्यासाठी मला त्यांच्या घरी जाऊन धाडी टाकायला सांगितल्या. हे सगळं खोटं असल्याचं माझ्या लक्षात आलं. या सगळ्यात आपला वापर करण्यात येत असल्याचंही माझ्या लक्षात आल्याचं मुजावर म्हणाले.



मोहन भागवत यांना धरुन आणा, असा एक गोपनीय आदेश देण्यात आल्याचा दावाही एटीएसचे माजी पोलीस निरीक्षक महिबूब मुजावर यांनी केला. मी या आदेशाचं पालन टाळलं होतं. तपास झाल्यानंतर वरिष्ठांना ही बाब लक्षात आली. मी काम केलं नाही म्हणून माझ्यावर खोटे गु्न्हे दाखल केले. त्यात मला अटक केली. मग सात-आठ वर्ष मी त्या प्रकरणात अडकून गेलो आणि त्यातून मी निर्दोष सुटलो,' असे एटीएसचे माजी पोलीस निरीक्षक महिबूब मुजावर म्हणाले.

'निर्दोष सुटताना सीआरपीसीच्या कलम ३१३ च्या अंतर्गत मी जबाब दिला. त्यात मी या सगळ्या गोष्टी सांगितल्या. तीच कागदपत्रं यांनाही (आज निकाल लागलेल्या प्रकरणात) पुरवण्यात आली. न्यायालयानं निकालात नेमका कशाचा उल्लेख केला याची मला कल्पना नाही, असे एटीएसचे माजी पोलीस निरीक्षक महिबूब मुजावर म्हणाले. त्यांनी न्यायालयाच्या निर्णयाविषयी समाधान व्यक्त केले.
Comments
Add Comment