
काही दिवसांपूर्वीच कैलास गोरंट्याल यांनी भाजपमध्ये जाणार असल्याचे संकेत दिले होते. अखेर त्या शक्यतेवर गुरुवार ३१ जुलै रोजी शिक्कामोर्तब झाले.
जालना विधानसभा मतदारसंघाने मागील तीन दशकात कधी कैलास गोरंट्याल तर कधी अर्जुन खोतकर यांनाच आमदार केले. खोतकर चारवेळा तर गोरंट्याल तीनवेळा आमदार झाले. आता भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे गोरंट्याल यांची बाजू मजबूत झाली आहे. तसेच जालन्यात भाजपची ताकद वाढली आहे. भाजपची शत प्रतिशतच्या दिशेने जालन्यात ताकदीने वाटचाल सुरू आहे. यामुळे शिवसेनेच्या चिंतेत भर पडली आहे. मित्रपक्षांचे आमदार असलेल्या मतदारसंघांमध्ये भाजप चतुराईने ताकद वाढवण्यावर भर देत आहे. साताऱ्यातील पाटणमध्ये सत्यजीत पाटणकर, भोरमध्ये संग्राम थोपटे, पुरंदरमध्ये संजय जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या तिन्ही मतदारसंघांमध्ये सध्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार आहेत. यामुळे भाजपच्या वाढत्या ताकदीने शिवसेना चिंतेत असल्याचे चित्र आहे.