Friday, August 1, 2025

काँग्रेसचे कैलास गोरंट्याल आता भाजपवासी

काँग्रेसचे कैलास गोरंट्याल आता भाजपवासी
मुंबई : जालना जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते आणि तीन टर्मचे आमदार आणि सध्याचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण माजी खासदार रावसाहेब दानवे, मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. कैलास गोरंट्याल यांनी तीन वेळा जालना विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. पण २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या अर्जुन खोतकर यांनी गोरंट्याल यांचा ३१ हजार ६५१ मतांनी पराभव केला. या पराभवाचे खापर गोरंट्याल सातत्याने काँग्रेसवर फोडत होते. उमेदवारी देण्यास खूप वेळ घेतला यामुळे प्रचाराला पुरेसा कालावधीच मिळाला नाही, असे त्यांचे म्हणणे होते. आता त्यांनी काँग्रेस सोडून थेट भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

काही दिवसांपूर्वीच कैलास गोरंट्याल यांनी भाजपमध्ये जाणार असल्याचे संकेत दिले होते. अखेर त्या शक्यतेवर गुरुवार ३१ जुलै रोजी शिक्कामोर्तब झाले.

जालना विधानसभा मतदारसंघाने मागील तीन दशकात कधी कैलास गोरंट्याल तर कधी अर्जुन खोतकर यांनाच आमदार केले. खोतकर चारवेळा तर गोरंट्याल तीनवेळा आमदार झाले. आता भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे गोरंट्याल यांची बाजू मजबूत झाली आहे. तसेच जालन्यात भाजपची ताकद वाढली आहे. भाजपची शत प्रतिशतच्या दिशेने जालन्यात ताकदीने वाटचाल सुरू आहे. यामुळे शिवसेनेच्या चिंतेत भर पडली आहे. मित्रपक्षांचे आमदार असलेल्या मतदारसंघांमध्ये भाजप चतुराईने ताकद वाढवण्यावर भर देत आहे. साताऱ्यातील पाटणमध्ये सत्यजीत पाटणकर, भोरमध्ये संग्राम थोपटे, पुरंदरमध्ये संजय जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या तिन्ही मतदारसंघांमध्ये सध्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार आहेत. यामुळे भाजपच्या वाढत्या ताकदीने शिवसेना चिंतेत असल्याचे चित्र आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा