
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीत वापरलेले सर्व ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट तपासणीत योग्य असल्याचे आढळले. त्यामुळे निवडणूक निष्पक्ष असून निकालांबात शंकेला वाव नसल्याचा निर्वाळा निवडणूक आयोगाने दिला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधीसह आपपल्या मतदारसंघात पराभूत झालेल्या १० उमेदवारांच्या तक्रारींनंतर आयोगाकडून हे पाऊल उचलण्यात आले.
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी १० उमेदवारांच्या विनंतीनुसार १० मतदारसंघांमध्ये क्रॉस-चेकिंग केले. या प्रक्रियेत ८ उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष उपस्थित राहून तपासणी पाहिली. तर, दोन उमेदवारांनी उपस्थित राहणे टाळले. यावेळी एकूण ४८ मतदार युनिट, ३१ नियंत्रण यंत्रे आणि ३१ व्हीव्हीपॅट यांची तपासणी झाली. त्याचप्रमाणे, निवडक मतदारसंघांमधील उमेदवारांच्या विनंतीवरून मायक्रोकंट्रोलर व मेमरी पडताळणीसाठी निदान चाचणी घेण्यात आली.
राज्यातील कोपरी-पाचपाखाडी, ठाणे, खडकवासला आणि माजलगाव या काही मतदारसंघांमध्ये मायक्रोकंट्रोलर व मेमरी पडताळणीसाठी निदान चाचण्या करण्यात आल्या. तर पनवेल, अलीबाग, आर्णी, येवला, चंदगड, कोल्हापूर उत्तर आणि उर्वरित माजलगावमध्ये निदान चाचणीसह मॉक पोलही घेण्यात आला. सर्व चाचण्यांदरम्यान ईव्हीएम यंत्रे योग्य प्रकारे कार्यरत असल्याचे प्रमाणित झाले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, ईव्हीएम यंत्रांमध्ये कोणतीही छेडछाड करता येत नाही. त्यामुळे निवडणूक निकालांबाबत शंका घेण्याचे कारण नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.