Saturday, August 2, 2025

'मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी काँग्रेसने माफी मागावी'

'मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी काँग्रेसने माफी मागावी'
मालेगाव : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील विशेष एनआयए न्यायालयाचा निकाल केवळ न्यायालयीन निर्णय नाही, तर तो एका दीर्घकाळ चाललेल्या राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश आहे. सर्व आरोपांमागे कोणताही ठोस पुरावा नाही, हे न्यायालयाने स्पष्टपणे नोंदवलं. पण याहून गंभीर बाब म्हणजे काँग्रेसनं जाणीवपूर्वक “हिंदू दहशतवाद” हा शब्दप्रयोग प्रचारात वापरत हिंदू समाजाला, श्रद्धेला, जगभरात बदनाम करण्याचा प्रयत्न केला. शतकानुशतकं मानवतेचं आणि सहिष्णुतेचं प्रतीक असलेल्या हिंदू धर्माला दहशतवाद्यांच्या रांगेत उभं करण्याचा अक्षम्य गुन्हा काँग्रेसने केला. आज कोर्टाने सत्य मांडलं, आता काँग्रेसनं हिंदू समाजाची माफी मागायला हवी, असे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. हिंदू कधीच दहशतवादी नव्हता आणि नसेलही, न्यायालयाच्या निर्णयाने हिंदूंना बदनाम करणाऱ्यांना मोठी चपराक मिळाली आहे; असेही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

याआधी २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल आला. तब्बल १७ वर्षांनंतर विशेष NIA न्यायालयाने सर्व ७ आरोपींना निर्दोष मुक्त केलं! ठोस पुराव्यांअभावी न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष एनआयए कोर्टाद्वारे हा निकाल जाहीर करण्यात आला.

नेमके काय झाले होते ?

मालेगावच्या मशिदी जवळ २९ सप्टेंबर २००८ रोजी झालेल्या बॉम्बस्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता आणि शंभरहून अधिक जखमी झाले होते. मशिदी जवळ दुचाकीचा स्फोट झाला होता. या प्रकरणात कर्नल प्रसाद पुरोहितसह साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि इतरांवर गंभीर आरोप ठेवण्यात आले होते.
Comments
Add Comment