Saturday, August 23, 2025

Somnath Suryavanshi death case: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मुंबई हायकोर्टाचा निर्णय ठेवला कायम

Somnath Suryavanshi death case: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मुंबई हायकोर्टाचा निर्णय ठेवला कायम
नवी दिल्ली: परभणीमध्ये न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी एक नवीन अपडेट समोर आली आहे. सोमनाथ सूर्यवंशी या विद्यार्थ्याच्या मृत्यूला पोलिसच जबाबदार असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, असे निर्देश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिले होते. आता सर्वोच्च न्यायालयानेही हा आदेश कायम ठेवला आहे. त्यामुळे आरोपी पोलिसांवर लवकरच गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलिस कोठडीतील मृत्यू प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने पोलिसांनाच दोषी ठरवले होते.  खंडपीठात दाखल याचिकेवर सोमनाथ यांच्या कुटुबीयांकडून वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी स्वत: युक्तीवाद केला होता. या प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिल्याने पोलिसी कार्यपद्धतीवरच ताशेरे ओढले गेले. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर त्याच्या  कुटुंबाने न्यायासाठी आक्रोश करताना शासकीय मदत सुद्धा नाकारली होती. या प्रकरणाची देशपातळीवर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

परभणीमध्ये १०  डिसेंबर २०२४ रोजी स्टेशन रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करून विटंबना करण्यात आली होती. या विटंबनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी ११  डिसेंबर रोजी परभणी जिल्हा बंदची हाक दिली. बंददरम्यान परभणीत जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या. त्यानंतर परभणी पोलिसांनी कोंबिग ऑपरेशन राबवत गुन्हे दाखल केले, ज्यात मृत सोमनाथ सूर्यवंशीलाही अटक करण्यात आली. अटक केलेल्यांपैकी सोमनाथ सूर्यवंशी या ३५ वर्षीय तरूणाचा न्यायालयीन कोठडीत गूढ मृत्यू झाला. सोमनाथ सूर्यवंशीच्या शरीरावर अनेक जखमा होत्या,  त्यामुळे पोलिसांच्या अमानुष मारहाणीमुळेच सोमनाथचा मृत्यू झाल्याचा आरोप केला गेला. सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूस जबाबदार धरून परभणी एलसीबीचे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने बडतर्फ करण्याची मागणी आंबेडकरी अनुयायांनी केली होती.
Comments
Add Comment