नवी दिल्ली : लोकसभेत ‘ऑपरेशन सिंदूर’वर चर्चा रंगली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी संसदेत स्पष्ट शब्दांत विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिलं. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर चालवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’वर भाष्य करताना मोदी म्हणाले, “हे सत्र भारताच्या गौरवाचं आहे, कारण आपल्या सैन्याने पाकिस्तानच्या अतिरेक्यांना त्यांच्या भूमीतच मातीत गाडलं.”
पंतप्रधान म्हणाले, “दहशतवाद्यांना पोसणाऱ्या आकांना कल्पनाही नव्हती की भारत एवढ्या आत घुसून कारवाई करेल. आपण बहावलपूर आणि मुरिकदे यांसारख्या पाकच्या गडांवर हल्ला करून त्यांना जमीनदोस्त केलं. हे ऑपरेशन म्हणजे १४० कोटी भारतीयांच्या इच्छाशक्तीचा विजय आहे.”
पहलगाममधील हल्ल्यात अतिरेक्यांनी धर्म विचारून निर्दोष नागरिकांची निर्घृण हत्या केली. देशात दंगल उसळू शकली असती, पण देशवासीयांनी संयम राखला. “मी देशवासीयांचा ऋणी आहे,” असं मोदींनी स्पष्ट केलं. “२ मेच्या मध्यरात्री आणि १० मेच्या पहाटे आपल्या सैन्याने पाकिस्तानमधील अनेक तळं उद्ध्वस्त केली. आणि २२ एप्रिलच्या हल्ल्याचा बदला, फक्त २२ मिनिटांत घेतला,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
काँग्रेसने इतिहासात केलेल्या चुकांमुळेच आज दहशतवादाची समस्या उग्र झाली नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत ‘ऑपरेशन सिंदूर’वरील ...
मोदींचं मत होतं की, याआधी भारताने अनेकदा पाकिस्तानशी युद्ध केलं, पण यावेळी आपण अशा भागात पोहोचलो जिथे आपण कधीही गेलेलो नव्हतो. पाकिस्तानला अण्वस्त्रांचा हवाला देऊन भारताला रोखण्याची सवय होती, पण यावेळी ती दादागिरी चालली नाही. “त्यांनी अणू धमकी दिली, पण आम्ही गोळीला उत्तर गोळीने दिलं,” असं ते म्हणाले.
काँग्रेसवर सडकून टीका
मोदींनी काँग्रेसवरही जोरदार हल्ला चढवला. “ऑपरेशन सिंदूरसारख्या राष्ट्रीय कारवाईला काँग्रेसचा पाठिंबा मिळाला नाही हे दुर्दैव आहे. जग भारताच्या बाजूने उभं होतं, पण काँग्रेस मात्र प्रश्नचिन्ह निर्माण करत होती,” असं त्यांनी सुनावलं. “काँग्रेसने सैन्याच्या मनोबलावर घाव घातला आहे. कारगिल विजय दिवस साजरा न करणारी काँग्रेस, आज पाकचीच भाषा बोलत आहे. त्यांना पाकव्याप्त काश्मीर कुणाच्या काळात गेला हेच आठवत नाही,” असा आरोपही त्यांनी केला.
आंतरराष्ट्रीय दबाव फेटाळला
पंतप्रधान म्हणाले, “१० मे रोजी भारताने ऑपरेशन सिंदूर थांबवण्याची घोषणा केली. कोणत्याही जागतिक नेत्याने आमच्यावर दबाव टाकलेला नाही. अमेरिकेचे उपराष्ट्रपती मला वारंवार फोन करत होते. शेवटी मी त्यांना स्पष्ट सांगितलं – जर पाकिस्तान मोठा हल्ला करेल, तर भारत आणखी मोठा हल्ला करेल. पाकिस्तानला मोठी किंमत मोजावी लागेल.”
ड्रोन मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडला
“९ मे रोजी पाकिस्तानने १,००० ड्रोन मिसाईल भारतावर सोडण्याचा प्रयत्न केला. पण आपल्या एअर डिफेन्स सिस्टिमने ते हवेतच नष्ट केलं. याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो, पण काँग्रेस मात्र पाकच्या खोट्या दाव्यांचा प्रचार करत होती,” असा घणाघात मोदींनी केला.
सर्जिकल, बालाकोट, सिंदूर – सैन्याचं यश
मोदी म्हणाले, “सर्जिकल स्ट्राईक, बालाकोट एअर स्ट्राईक आणि आता ऑपरेशन सिंदूर – हे सर्व आमच्या सैन्याच्या सामर्थ्याचे पुरावे आहेत. आपण जे ठरवलं होतं ते १०० टक्के पूर्ण केलं. १० आणि ११ मे भारताच्या सैन्याच्या पराक्रमासाठी कायम लक्षात राहतील.”
पाकिस्तान गुडघ्यावर
“भारतीय हल्ल्यांमुळे पाकिस्तानला गुडघ्यावर यावं लागलं. त्यांनी आमच्या DGMO ला फोन करून हल्ले थांबवण्याची विनंती केली. जगभरातून भारताला पाठिंबा मिळाला. पण काँग्रेस मात्र आपल्याच सैन्याला संशयाच्या नजरेने पाहत राहिली,” असा हल्ला मोदींनी केला.