हिंदू धर्मामध्ये नागपंचमी सणाचे विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना हा पवित्र महिना मानला जातो, श्रावण महिना हा महादेवांना समर्पित आहे. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला नागपंचमीचा सण साजरा केला जातो. या दिवशी नागदेवतेची विधीवत पूजा केल्यास फलप्राप्ती होते, असे म्हणतात. श्रावण महिन्यात महादेवांची भक्ती भावानं पूजा केली जाते, श्रावण महिन्यात अनेक सण, उत्सव देखील असतात त्यामुळे या महिन्याला उत्सवाचा महिना देखील मानलं जातं. या महिन्यात येणारा प्रमुख सण म्हणजे नागपंचमी. उद्या म्हणजेच मंगळवारी सर्वत्र उत्साहात हा सण साजरा करण्यात येणार आहे. नागपंचमी हा सण नागदेवतेला समर्पित असतो. चला तर मग या दिवशी काय करावं आणि काय करू नये? ते जाणून घेऊयात...
नागपंचमी पूजा विधी
नागपंचमीच्या दिवशी, सर्वप्रथम सूर्योदयापूर्वी उठावे आणि नित्यकर्मातून निवृत्त व्हावे. स्नान करावे. यानंतर, भगवान शिवासोबत नागदेवतेची पूजा करावी. नागदेवतेच्या पूजेसाठी फळे, फुले, मिठाई आणि दूध अर्पण करावे. मान्यतांनुसार, ज्या लोकांच्या कुंडलीत काळसर्प दोष किंवा राहू-केतूशी संबंधित कोणताही दोष आहे, त्यांनी नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा अवश्य करावी.
अहिल्यानगर : शनिशिंगणापूर देवस्थानचे माजी विश्वस्त आणि सध्याचे उप कार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी आत्महत्या केली. सोमवारी सकाळी राहत्या घरी ...
नागपंचमीदिवशी काय करावं?
नागपंचमीच्या दिवशी महादेवांसोबत नागदेवतेची देखील पूजा करावी. महादेव आणि नागदेवतेची प्रार्थना करावी. सकाळी लवकर उठून घराजवळ कुठे नागदेवतेचं मंदिर असेल तर तिथे जाऊन नागदेवतेची पूजा करावी, किंवा घरीच नागदेवतेच्या प्रतिमेची पूजा केली जाते. नागदेवतेला दूध अर्पण करावं, अशी मान्यता आहे, की नागदेवतेची पूजा केल्यानं नागदेवतेचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असतो. एक मान्यता अशीदेखील आहे की, या दिवशी फक्त उकडलेलंच अन्न खावं, या मागे अनेक कारण आहेत, श्रावण हा महिना पावसाळ्यात येतो, पावसाळ्यामध्ये तुमची रोगप्रतिकार शक्ती कमी झालेली असते, उकडलेलं अन्न हे पचनासाठी हलकं असतं, त्यामुळे या दिवशी उकडलेलं अन्नच खावं अशी मान्यता आहे. या सणासोबत आणखी एक प्रथा जोडली गेली आहे, ती म्हणजे या दिवशी झोके बांधले जातात. शहरी भागात ही प्रथा काहीशी लोप पावली असली तरी देखील ग्रामीण भागांमध्ये आजही सर्वत्र मोठ्या उत्साहात नागपंचमीच्या दिवशी झोके बांधले जातात. या सणाला विवाहित महिला आपल्या माहेरी येतात, या महिला झोका खेळण्याचा आनंद घेतात, ही प्रथा आजही ग्रामीण भागांमध्ये सुरू आहे.
नागपंचमीदिवशी काय करू नये?
नागपंचमीच्या दिवशी अनेक ठिकाणी जिवंत नाग पकडून त्याची पूजा करण्याची प्रथा आहे, महाराष्ट्रातही एक -दोन ठिकाणी, पूर्वी ही प्रथा सुरू होती, मात्र आता त्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं जिवंत नागाची पूजा करू नये, त्याला दूध पाजण्याचा प्रयत्न करू नये, कारण त्यामुळे त्याच्या जीवाला हानी पोहचण्याची शक्यता असते, तसेच सर्पदंश झाल्यास तुम्हाला देखील जीव गमवावा लागू शकतो. त्यामुळे अशा पद्धतीनं जिवंत साप पकडू नये, असं म्हणतात की नागपंचमीच्या दिवशी कोणाचंही मन दुखवू नये. नागपंचमीच्या दिवशी जमीन खोदणे टाळावे. असे मानले जाते की जमिनीच्या आत सापांची बिळे असतात. जमीन खोदल्याने सापांचे घर किंवा बिळे नष्ट होऊ शकतात. असे केल्याने अनेक पिढ्यांना पाप लागते. धार्मिक शास्त्रानुसार, नागपंचमीच्या दिवशी धारदार वस्तूंचा वापर करू नये. जसे की शिवणकाम, भरतकाम इत्यादी अशुभ मानले जाते.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल प्रहार न्यूजलाईन कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)