Monday, October 27, 2025
Happy Diwali

मँचेस्टर टेस्टमधील गिल-राहुलचा ऐतिहासिक विक्रम

मँचेस्टर टेस्टमधील गिल-राहुलचा ऐतिहासिक विक्रम
इंग्लंड : मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर भारतीय फलंदाजांनी इतिहास रचलाय. शुभमन गिल आणि केएल राहुल यांनी 188 धावांची ऐतिहासिक भागीदारी करत 21व्या शतकातील सर्वात मोठा विक्रम आपल्या नावावर केलाय. 417 चेंडू खेळत त्यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. पण हा सामना फक्त धावांचा नव्हता, तर धैर्याचा, संयमाचा आणि कर्णधारपदाचा होता ! जाणून घ्या हा थरारक सामना आणि गिल - राहुलची ऐतिहासिक कामगिरी. मँचेस्टर कसोटीमध्ये भारताची अवस्था नाजूक झाली होती. पहिल्याच षटकात यशस्वी जयस्वाल आणि साई सुदर्शन शून्यावर बाद झाले. इंग्लंडने भारतासमोर 669 धावांचा डोंगर उभा केला होता आणि भारत 311 धावांनी पिछाडीवर. मात्र दोन बादवरून पुढे सुरू झाला खरा चमत्कार! शुभमन गिल आणि केएल राहुल यांनी 417 चेंडूंमध्ये 188 धावांची भागीदारी केली. हाच 21व्या शतकातील इंग्लंडमधील भारतीय जोडीचा सर्वात मोठा विक्रम ठरला. याआधी हा विक्रम राहुल द्रविड आणि संजय बांगर यांच्या नावावर होता. त्यांनी 2002 मध्ये हेडिंग्ले क्रिकेट मैदानावर 405 चेंडू खेळत 170 धावा केल्या होत्या. त्यांच्या खालोखाल सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांचा नंबर लागतो. त्यांनी 357 चेंडूंमध्ये 249 धावांची भागीदारी केली होती. आता गिल-राहुल यांच्या जोडीने हा विक्रम मोडीत काढलाय. क्रिकेट हा खेळ आहे संयमाचा, रणनीतीचा आणि कधी कधी चमत्कारांचा ! मँचेस्टरच्या मैदानावर जेव्हा भारताची अवस्था 0/2 अशी झाली तेव्हा इंग्लंडच्या गोलंदाजांचे डोळे चमकत होते. मात्र शुभमन गिल आणि केएल राहुल यांनी आपल्या बॅटने इंग्लंडच्या क्रिकेटपटूंची चमक उतरवली. अजून लढाई बाकी आहे असा संदेश या जोडीने दिला. 188 धावा, 417 चेंडू आणि एक अभेद्य खेळी. केएल राहुलने 90 धावा केल्या, मात्र शतक पूर्ण करता आलं नाही. बेन स्टोक्सच्या एका खाली राहिलेल्या चेंडूने त्याला एल्बीडब्ल्यू केलं. तर गिलने कर्णधाराशी साजेशी खेळी करत 103 धावांसह शतक ठोकलं. शुभमन गिल हा तरुण कर्णधार मँचेस्टरच्या मैदानावर इतिहास रचत आहे. या मालिकेत त्याने चार शतकं ठोकली. एका मालिकेत चार शतकं झळकावणारा तो तिसरा कर्णधार ठरलाय. या विक्रमाने त्याला सर डॉन ब्रॅडमन आणि सुनील गावसकर यांच्या पंक्तीत बसवलंय. शुभमन गिल आता सुनील गावसकर यांच्या 774 धावांच्या विक्रमाच्या जवळ आहे. देशासाठी खेळताना त्याच्यावर दडपण आलं असेल, पण त्याची ही खेळी भावी क्रिकटेपटूंना प्रेरणादायी आहे.

कर्णधार म्हणून टेस्ट मालिकेत सर्वाधिक धावा करणारे क्रिकेटपटू 

ऑस्ट्रेलियाच्या डॉन ब्रॅडमन यांनी इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत 810 धावा केल्या भारताच्या शुभमन गिलने इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत 722 धावा केल्या ऑस्ट्रेलियाच्या ग्रेग चॅपलने वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेत 702 धावा केल्या वेस्ट इंडीजच्या क्लाईव्ह लॉईडने भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत 636 धावा केल्या इंग्लंडच्या पीटर मेने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत 582 धावा केल्या

एका टेस्ट मालिकेत कर्णधार म्हणून सर्वाधिक शतकं कुणी केली ?

ऑस्ट्रेलियाच्या डॉन ब्रॅडमन यांनी भारताविरुद्ध चार शतकं केली भारताच्या सुनील गावसकरने वेस्ट इंडिजविरुद्ध चार शतकं केली भारताच्या शुभमन गिलने इंग्लंड विरुद्ध चार शतकं केली शुभमन गिलने कर्णधार म्हणून पहिल्याच टेस्ट मालिकेत चार शतकं ठोकणारा पहिला खेळाडू होण्याचा मान मिळवला. वॉरविक आर्मस्ट्राँग, डॉन ब्रॅडमन, ग्रेग चॅपल, विराट कोहली आणि स्टीव्हन स्मिथ यांना गिलने मागे टाकलंय. या खेळाडूंनी आपल्या पहिल्या मालिकेत प्रत्येकी तीन शतकं केली होती. शुभमन गिलच्या खांद्याला खांदा लावून दुसऱ्या बाजूने किल्ला लढवला तो केएल राहुलने. दोन बाद नंतर या दोघांनी मैदानात पाय रोवले आणि संघाला खडतर संकटातून बाहेर काढलं. राहुल मँचेस्टर कसोटीमध्ये 90 धावांवर बाद झाला, मात्र त्याने या मालिकेत 511 धावा कुटल्या. इंग्लंडच्या भूमीवर 500 पेक्षा जास्त धावा करणारा तो सुनील गावसकर यांच्यानंतरचा दुसरा आशियाई सलामीवीर ठरला. राहुलचं तंत्र आणि गिलचा आत्मविश्वास आणि त्यांच्या फलंदाजीने क्रिकेटप्रेमी भारावून गेले आहेत. मँचेस्टर कसोटी ड्रॉ झाली आणि भारताने मालिका जिंकण्याच्या आशा जिवंत ठेवल्या. रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनीही शतकं ठोकत सामना वाचवला. इंग्लंड 2-1 ने आघाडीवर आहे, मात्र ओव्हलवरील अंतिम सामन्यात भारताला मालिकेत बरोबरी करण्याची संधी आहे. त्यामुळे गिल, राहुल आणि पंत यांच्यावर सगळ्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

मँचेस्टरच्या मैदानावर गिल आणि राहुल यांनी इतिहास रचलाय

गिल आणि राहुलचा खेळ हा फक्त धावांचा नव्हता, तर तो होता संयमाचा, धैर्याचा आणि कर्णधारपदाचा! गिल आणि राहुल यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना चांगलाच समाचार घेतला. 417 चेंडू खेळणं म्हणजे इंग्लंडच्या मैदानावर लोखंडी मनगट दाखवण्यासारखं होतं आणि या दोन्ही खेळाडूंनी ते दाखवलं. आता सगळ्यांच्या नजरा ओव्हलच्या अंतिम कसोटी सामन्याकडे लागल्या. भारत या मालिकेत बरोबरी करेल का? की इंग्लंड विजयाचा झेंडा फडकावेल? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >