
पुणे : राज्यभरात सध्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये सुरु असलेल्या तुफान पावसामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. धरणांत एकूण ९१ टक्के पाणीसाठी आहे. वरसगाव धरण ९४ टक्के भरल्याने ६३८.२० क्यूसेकचा पाणी विसर्ग सुरू आहे. मुठा नदीत शनिवारी दुपारी १६७२ क्यूसेक पाणी विसर्ग सुरू केला. त्यामुळे एकूण २२७२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग मुठा नदीत होत आहे. हे पाणी खडकवासला धरणात येत असल्याने तेथून दुपारी ३ वाजता १७१० क्यूसेक पाण्याचा विसर्ग मुठा नदीत सुरू केला आहे. यामुळे नदीकाठच्या भागाला दक्षतेचा इशारा दिला आहे.
दोन दिवसांपासून पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला पाणलोट क्षेत्रात जओरदार पाऊस झाला. त्यामुळे धरणांच्या पाणीपातळीत झपाटयाने वाढ होत आहे. वरसगाव धरणही भरण्याच्या मार्गावर आहे. या धरणाची साठवण क्षमता १२.५० टीएमसी असून सध्या तेथे ११.५० टीएमसी पाणी आहे. खबरदारीचा उपाय म्हणून वीज निर्मिती केंद्र सुरू केले असून त्यासाठी ६०० क्यूसेक पाणी सोडण्यात येत आहे. साडेदहा टीएमसी साठवण क्षमता असलेले पानशेत धरणाचा पाणीसाठी शनिवारी ९१ टक्के झाला असून धरणात सध्या ९.२३ टीएमसी पाणीआहे. वरसगाव, पानशेत धरणातून सोडलेले पाणी खडकवासला धरणात येते. पूरस्थिती उद्भवू नये म्हणून यंदा पाटबंधारे विभागाकडून आधीच खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. तेथे ७५ टक्के पाणी आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यास तसेच वरसगाव, पानशेतचा विसर्ग वाढल्यास खडकवासला मधील विसर्ग वाढेल त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नदीकाठच्या भागात दक्षतेचा इशारा दिला आहे.