महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे
जरासंध हा महाभारतकालीन मगध देशाचा राजा व महाभारतातील कृष्णाचा प्रमुख शत्रू होता. बृहद्रथ नावाचा राजा होता. त्याला मुल-बाळ नव्हते. म्हणून त्याने ऋषी चंडकौशिक यांच्याकडून एक फळ घेतले आणि ते आपल्या दोन्ही पत्नींना खाण्यास दिले. त्या फळामुळे दोन्ही राण्या गर्भवती झाल्या, पण त्यांना अर्ध्या-अर्ध्या शरीराचे बालक झाले. ते बालक पाहून राजा घाबरला. तेव्हा ‘जरा’ नावाची राक्षसीण तिथे आली. तिने त्या अर्ध्या बाळांना एकत्र ठेवले. ते बालक एकत्र येताच ते जिवंत झाले. ‘जरा’ नावाच्या चेटकिणीने ते एकत्र जुळविल्यामुळे त्याला जरासंध असे नाव दिले.
जरासंध हा एक शक्तिशाली राजा असून त्याचे स्वप्न एक चक्रवती सम्राट बनण्याचे होते; परंतु तो अत्यंत क्रूर होता. अनेक देशांच्या राजांना त्याने आपल्या कारागृहात बंदी बनवून ठेवले होते. मथुरा नरेश कंस त्याचा जावई होता व तो त्याचा सासरा होता. श्रीकृष्णाने केलेल्या कंसवधाचा प्रतिशोध घेण्यासाठी त्याने १७ वेळा मथुरा राज्यावर चढाई केली, पण प्रत्येक वेळी त्याला असफल व्हावे लागले. श्रीकृष्णाने भीमाच्या हातून याचा वध घडवून आणला. कृष्णाने राजसूय यज्ञ करण्याची कल्पना उचलून धरली, पण पांडवांना जरासंधाच्या सम्राटपदाची माहिती सांगून त्याला हरवल्याशिवाय युधिष्ठिराला राजसूय यज्ञ करण्याचा अधिकार नाही असे दाखवून दिले. जरासंध व यादव यांच्यामधील वैराचा सर्व इतिहास सांगितला. जरासंधाच्या बाजूने असलेल्या राजांची नामावळी सांगितली. एक युधिष्ठिराचा मामा पुरुजित कुंतिभोज सोडला तर इतर सर्व राजे, त्यांत पांडूचा मित्र असलेला राजा भगदत्त, कृष्णाचा सासरा भीष्मक, शिशुपाल वगैरे सर्व, जरासंधालाच सम्राट मानतात. थोडादेखील विसावा न घेता घोर अस्त्रांनी तीनशे वर्षे लढलो तरी जरासंधाचा पराभव करणे शक्य नाही. या कारणास्तव भोजांच्या अठरा घराण्यांनी व नंतर इतर यादव घराण्यांनीही, मथुरा सोडून द्वारकेला नवीन शहर वसवून, बंदोबस्तात राहणे पसंत केले. जरासंध व त्याचे दोन सेनापती हंस व डिंभक यांच्या पराक्रमामुळे त्याने अनेक राजे युद्धात हरवून, त्यांना तुरुंगात टाकले व शंभर राजे पकडल्यावर त्यांचा यज्ञात बळी देण्याचा त्याचा विचार आहे, तेव्हा त्याला हरवल्याशिवाय वा मारल्याशिवाय तुम्ही राजसूय यज्ञ कसा करणार असा प्रश्न उपस्थित केला. वास्तविक, यादवांबरोबरच्या युद्धात हंस व डिंभक मरण पावले होते. तरीही युद्धामध्ये जरासंधाला हरवण्याची उमेद यादवांना राहिली नव्हती. तेव्हा, द्वंद्वामध्ये गाठून जरासंधाला एखाद्या महान वीराने मारले तरच त्याचे पारिपत्य शक्य होते. यासाठी अर्थातच भीमाशिवाय दुसरा कोण समर्थ होता? वास्तविक कुरूंचे व जरासंधाचे वैर नव्हते. भीष्माशी वैर वा युद्ध जरासंधालाही परवडले नसते! युधिष्ठिराने सरळ दूत पाठवून राजसूय यज्ञ करण्याचा प्रस्ताव जरासंधासमोर मांडला असता, तर युधिष्ठिराबद्दलच्या आदरापोटी व भीष्माच्या धाकाने जरासंधाने कदाचित त्याला मान्यता दिलीही असती, पण या पर्यायात कृष्णाला रस नव्हता! त्याला या निमित्ताने जरासंधाचा काटा काढावयाचा होता व त्याच्या कैदेत पडलेले आपले बांधव सोडवायचे होते.
अर्जुन, कृष्ण व भीम एकदा जरासंधाकडे ब्राह्मणाच्या वेषात गेले. जरासंधाने त्या ब्राह्मणांचे यथोचित स्वागत करून त्यांना त्यांची इच्छा विचारली. तेव्हा ब्राह्मणांनी जरासंधाशी मल्लयुद्ध करण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा हे ब्राह्मण वेशात क्षत्रिय असल्याचे त्याने ओळखले. तसेच त्यांची खरी ओळख देण्यास सांगितले. तेव्हा कृष्णाने स्वत:ची व अर्जुनासह भिमाची ओळख करून तिघांपैकी कोणाशीही मल्लयुद्ध करण्यास जरासंधाला आव्हान केले, जरासंधाने मल्लयुद्धासाठी भीमाची निवड केली. भीम व जरासंधाचे द्वंद्व युद्ध २८ दिवस चालले. २७ दिवसांच्या दरम्यान भिमाने जरासंधाचे दोन तुकडे करून ते फेकले तरी दरवेळेला ते पुन्हा जुळून येत होते. अखेर भीम थकला. तेव्हा २८ व्या दिवशी श्रीकृष्णाने एका काडीचे दोन भाग करून डावा भाग उजवीकडे व उजवा भाग डावीकडे फेकून भिमाला सुचित केले. त्याप्रमाणे भिमानेही जरासंधाचे दोन तुकडे करून ते विपरीत दिशांना फेकले. त्यामुळे ते जुळू शकले नाहीत. अशाप्रकारे जरासंधाचा मृत्यू झाला.
श्रीकृष्णांनी जरासंधाच्या मृत्यूनंतर त्याच्या बंदीवासात असलेल्या राजांची सुटका केली. त्या राजांनी पांडवांचे मांडलीकत्त्व पत्करून राजसुय यज्ञात मदत करण्याचे मान्य केले, तसेच कृष्णाने जरासंधाचा पुत्र सहदेव याचा राज्याभिषेक केला. सहदेव महाभारत युद्धात पांडवांच्या बाजूने लढला. बिहार राज्यात जरासंधाचा आखाडा या नावाने एक आखाडा असून त्या ठिकाणी भीम व जरासंधाचे द्वंद्व युद्ध झाले असे मानले जाते.