Sunday, August 24, 2025

...म्हणून हरिद्वारच्या मनसा मंदिरात चेंगराचेंगरी

...म्हणून हरिद्वारच्या मनसा मंदिरात चेंगराचेंगरी

हरिद्वार : उत्तराखंडमधील हरिद्वारच्या मनसा मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू झाला. दर्शनासाठी भाविकांची मंदिराच्या आवारात आणि पायऱ्यांवर गर्दी झाली होती. रांग हळू हळू पुढे सरकत होती. याच सुमारास विजेची तार तुटल्याची अफवा पसरली आणि चेंगराचेंगरी झाली. 'करंटवाली तार सीढियोंपर गिरी है' असं ओरडत कोणीतरी आलं आणि चेंगराचेंगरी सुरू झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू झाला आणि २८ जण जखमी झाले. जखमींमध्ये आठ महिला आणि सात मुले आहेत. जखमींपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे.

मंदिराच्या इमारतीत जाण्या - येण्यासाठी एकच मार्ग आहे. या मार्गावरुन चालत ये - जा करावी लागते. यामुळे त्याच मार्गावर चेंगराचेंगरी सुरू झाल्यावर मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. अफवा पसरली आणि प्रत्येकजण स्वतःला वाचवण्यासाठी मिळेल त्या वाटेने धावत सुटले. यामुळे गोंधळ झाला, चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू झाला आणि २८ जण जखमी झाले. मृतांमध्ये आणि जखमींमध्ये प्रामुख्याने उत्तर प्रदेश आणि बिहारचे नागरिक आहेत.

सर्व जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रशासनाने चेंगराचेंगरी प्रकरणी चौकशीचे निर्देश दिले आहेत. सीसीटीव्ही फूटेज आणि प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेली माहिती याआधारे तपास सुरू आहे. अफवा कोणी पसरवली याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. दोषींवर कारवाई केली जाणार आहे.

न्यायदंडाधिकारी चौकशी करणार

चेंगराचेंगरी प्रकरणी न्यायदंडाधिकारी चौकशी करतील. अहवाल आला की दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई केली जाईल, असे उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सांगितले. चेंगराचेंगरीतील मृतांच्या नातलगांना नियमानुसार प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत दिली जाईल. तसेच जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत दिली जाईल; असेही उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले.

Comments
Add Comment