मुंबई : काही वर्षांपूर्वी 'चकदा एक्सप्रेस' या सिनेमात अनुष्का शर्मा ही झुलन गोस्वामी भूमिका साकारत होती. सिनेमाचा फर्स्ट लूकही समोर आला होता. मात्र नंतर या सिनेमाबद्दल पुढे काहीच अपडेट आलं नाही. हा सिनेमा डबाबंद झाला अशीही चर्चा झाली. आता सिनेमातील एका अभिनेत्यानेच यावर भाष्य केलं आहे.
अभिनेता दिव्येंदु भट्टाचार्य यांनी एका मुलाखतीत म्हणाले "तुम्हाला विश्वास बसणार नाही पण मी सुद्धा या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहे. मी नेहमी लोकांना सांगतो की, हा सिनेमा खूप दमदार बनला आहे. दिग्दर्शक प्रोसित रॉयच्या घरी मी हा सिनेमा पाहिला. मी त्यांना म्हणालो की 'सिनेमा अजून रिलीज होत नाहीये कमीत कमी मला तरी दाखवा.' तेव्हा ते म्हणाले की 'सिनेमा पूर्णपणे शूट झालेला नाही. अजून काम बाकी आहे.' पण मी तो पाहिला..खूपच सुंदर बनला आहे."
तो पुढे म्हणाला, "अनुष्का शर्माचा सर्वोत्तम अभिनय या सिनेमात पाहायला मिळतो. तिने खूप चांगलं काम केलं आहे. सिनेमा रिलीज का होत नाहीये हे मला माहित नाही. माझ्याकडे सिनेमाबद्दल काहीही माहिती असती तर मी लगेच सांगितली असती. पण मला खरोखर माहित नाही. एका बाजूला क्लीन सेट आणि दुसऱ्या बाजूला नेटफ्लिक्स आहे. दोघांमध्ये काय चाललंय काहीच कळत नाही. याचा प्रेक्षकांवरही परिणाम होत आहे आणि आर्थिक नुकसानही आहे. एक कलाकार म्हणून मला असंच वाटतं की सिनेमा रिलीज व्हायला पाहिजे. कारण कोणत्याही सिनेमामागे अनेक लोकांची मेहनत असते. हा एक लांबलचक आणि भावनिकरित्या शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा सिनेमा आहे."
अनुष्का शर्माने २०२२ साली 'चकदा एक्सप्रेस' कमबॅक सिनेमा म्हणून घोषणा केली होती. अनुष्काच्याच 'क्लीन स्लेट' प्रोडक्शनने याची निर्मिती केली होती. मात्र गेल्या वर्षीच अनुष्काने आपल्या प्रोडक्शन हाऊसमधून पायउतार झाली आणि आपल्या भावाकडे तिने जबाबदारी सोपवली.