Saturday, August 23, 2025

राजस्थानमधील शाळा दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना १० लाखांची मदत

राजस्थानमधील शाळा दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना १० लाखांची मदत

जयपूर : राजस्थानातील झालावाड जिल्ह्यातील मनोहरथाना ब्लॉकमधील दांगीपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पीपलोदी गावात शुक्रवारी शाळेच्या इमारतीचा एक भाग कोसळल्याने ७ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, तर २१ विद्यार्थी जखमी झाले होते. या घटनेनंतर राज्य सरकारने मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत आणि एका नातेवाईकाला कंत्राटी आधारावर नोकरी देण्याची घोषणा केली आहे.

राज्याचे शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनी सांगितले की, "या हृदयद्रावक घटनेतील पीडित कुटुंबीयांना सरकार सर्वतोपरी मदत करणार आहे. मृत विद्यार्थ्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ, नव्याने उभारल्या जाणाऱ्या शाळा इमारतीतील वर्गांचे नामकरण या विद्यार्थ्यांच्या नावावर करण्यात येणार आहे. तसेच, पीपलोदी गावात एक कोटी रुपयांच्या खर्चाने भव्य शाळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे." पीपलोदी व चांदपुरा भीलान गावांतील तीन स्मशानभूमींमध्ये शनिवार सकाळी सातही मृत विद्यार्थ्यांचे एकत्र अंतिम संस्कार करण्यात आले. गावात शोककळा पसरली असून, भावनिक वातावरण निर्माण झाले होते. कान्हा आणि मीना या भावंडांची अंत्ययात्रा एकाच अर्थीवर निघाली होती. झालावाड जिल्हाधिकारी अजयसिंह राठोड यांनीही पीपलोदी गावात भेट देऊन शोकाकुल कुटुंबीयांची भेट घेतली.

शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या यादीनुसार, कान्हा छोटूलाल मुलगा (७), कुंदन बीरम मुलगा (१०), हरीश बाबूलाल मुलगा (११), प्रियंका मांगीलाल मुलगी (१२), पायल लक्ष्मण मुलगी (१३), मीना छोटूलाल मुलगी (१०), कार्तिक हरकचंद मुलगा (८) यांचा मृत्यू झाला. सर्व शवविच्छेदनानंतर शनिवारी पहाटे कडक पोलीस बंदोबस्तात मृतदेह गावाकडे रवाना करण्यात आले. हे मृतदेह येताच संपूर्ण गावात एकच गोंधळ उडाला.

Comments
Add Comment