Friday, August 15, 2025

मुंबई, ठाण्याला 'ऑरेंज' अलर्ट, मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबई, ठाण्याला 'ऑरेंज' अलर्ट, मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबई : भारतीय हवामान विभागाने मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यासाठी 'ऑरेंज' अलर्ट जारी केला आहे, तर पालघर जिल्ह्यासाठी 'येलो' अलर्ट कायम आहे. पुढील २४ तासांत मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिवसभरात येणारी मोठी भरती आणि सततच्या पावसामुळे पाणी साचण्याचा धोका जास्त आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबईसाठी २४ जुलै ते २७ जुलै या कालावधीत ४.५ मीटरपेक्षा जास्त उंचीची भरती येण्याची शक्यता वर्तवली आहे.

दरम्यान, शुक्रवारी सकाळी ८ ते ९ या वेळेत मुंबई आणि उपनगरांच्या अनेक भागांत जोरदार पाऊस झाला. पश्चिम उपनगरात सर्वाधिक ३५ मि.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. जोरदार पावसामुळे सखल भागांमध्ये, विशेषतः अंधेरी सबवेमध्ये पाणी साचले, ज्यामुळे तो बंद झाल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. रेल्वे सेवा आणि बेस्ट बस वाहतूक सामान्यपणे सुरू होती.

राज्यात सहा जिल्ह्यांसह पुणे घाट, सातारा घाट परिसरात रेड अलर्ट

राज्यात पुढील २४ तासासाठी रायगड, रत्नागिरी, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली या सहा जिल्ह्यांसह पुणे घाट, सातारा घाट परिसरात रेड अलर्ट देण्यात आला असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.

भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्रामार्फत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना दि.२५ जुलै २०२५ सायंकाळी ५.३९ ते दि. २७ जुलै २०२५ रात्रौ ८.३० पर्यंत ४.१ ते ४.८ मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. समुद्राची धूप आणि उंच लाटांचे तडाखे समुद्र किनारी येण्याचा इशारा देण्यात आला असून जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदी इशारा पातळी ओलांडली असून नागरीकांना सतर्कतेचा सूचना देण्यात आल्या आहेत. पवना धरण ८२.२१% भरले असून पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू आहे पवना धरणातून १६०० क्युसेक्स पाणी नदीपात्रात सोडले जाऊ शकते त्या अनुषंगाने नागरिकांना सूचित करण्यात आले आहे.

मोडक सागर, मध्य वैतरणा, तानसा धरणातुन विसर्ग सुरू

मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात पाणी पुरवठा करणाऱ्या मोडक सागर, मध्य वैतरणा आणि तानसा या धरणातुन अनुक्रमे ४४८८.२५, २०१२.६७ आणि ३३१५.२५ क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. आपत्तीच्या अनुषंगाने प्रशासनातर्फे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांना संभाव्य आपत्कालीन परिस्थितीत सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा