
नवी दिल्ली: मुंबईमध्ये ११ जुलै २००६मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील सर्व १२ आरोपींची मुंबई उच्च न्यायालयाने सुटका केल्याचा निर्णय दिला आहे. आता या निर्णयाविरोधात सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर आज यावर सुनावणी केली जाणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. यावर आज सुनावणी होणार आहे.
मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटाप्रकरणी सत्र न्यायालयाने १२ पैकी पाच आरोपींना फाशीची शिक्षा, तर उर्वरित आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने काल या सर्व आरोपींबाबतचा सत्र न्यायालयाचा निकाल रद्द करून त्यांची तातडीने सुटका करण्याचे आदेश दिले. मात्र आता या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणी आता सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
विशेष न्यायालयाने या प्रकरणी १३ आरोपींवर खटला चालवला होता. त्यात कमाल अन्सारी (आता मृत), मोहम्मद फैझल अत्तार रहमान शेख, एहतेशाम कुतुबुद्दीन सिद्दिकी, नाविद हुसेन खान आणि आसिफ खान यांना विशेष न्यायालयाने बॉम्ब ठेवल्याच्या मुख्य आरोपांसह अन्य आरोपांत दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली होती. तर, तन्वीर अहमद मोहम्मद इब्राहिम अन्सारी, मोहम्मद माजिद मोहम्मद शफी, शेख मोहम्मद अली आलम शेख, मोहम्मद साजिद मार्गुब अन्सारी, मुझम्मिल अतौर रहमान शेख, सुहेल मेहमूद शेख आणि जमीर अहमद लतीउर रहमान शेख यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. वाहिद शेख याला न्यायालयाने निर्दोष ठरवले होते. गेल्या १९ वर्षांपासून कैदेत असलेल्या सर्व आरोपींची जामिनावर तातडीने सुटका करण्याचे आदेश न्यायमूर्ती किलोर आणि न्यायमूर्ती चांडक यांच्या खंडपीठाने दिले.