
मुंबई (प्रतिनिधी) : पवई तलाव स्वच्छतेसाठी महापालिका दिवसरात्र काम करीत असून कोट्यवधी रुपये खर्च करीत आहेत. तलावात दररोज १८ दशलक्ष लिटर प्रक्रिया न केलेले सांडपाणी भरत असल्याचे महापालिकेनेच मान्य केले आहे. पवई तलाव प्रदूषणाच्या विळख्यात अडकला आहे, त्यामुळे हा तलाव प्रदूषणमुक्त होण्यासाठी येथे विसर्जनावर बंदी घालावी अशी आग्रही मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे. आता गणेशोत्सव, नवरात्रोत्सवानिमित्त पवई तलावात मूर्ती विसर्जन करण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी करणारे पत्र रहिवासी आणि पर्यावरण अभ्यासकांनी मुंबई महानगरपालिका आणि स्थानिक पोलीस ठाण्याला दिले आहे.
पर्यावरणासाठी काम करणाऱ्या नॅटकनेक्ट फाऊंडेशनसह अनेक स्थानिक रहिवाशांनी मुंबई महापालिका, तसेच पोलिसांना कृत्रिम तलावांना प्रोत्साहन द्यावे, तसेच मोठ्या सार्वजनिक मूर्तीच्या विसर्जनासाठी स्वतंत्र तलाव उभारण्याची विनंती केली आहे. तसेच पवई तलावात मगर, तसेच इतर पक्षांचा अधिवास आहे. विसर्जनासाठी या तलावाचा वापर करण्यात आला तर आधीच झालेल्या प्रदूषणात आणखी भर पडेल आणि तलावाची
प्रदूषण पातळी वाढेल, अशी भीती नॅटकनेक्टचे संचालक बी. एन. कुमार यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, मागील महिन्यात पालिकेनेच तलावात दररोज १८ दशलक्ष लिटर प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडण्यात येत असल्याचे सांगितले होते. सांडपाणी वळविण्यासाठी आणि शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र ही कामे वेळेत केली जात नसल्याचा आरोप अभ्यासक तसेच स्थानिकांनी केला आहे. यापूर्वीही पवई तलावातील प्रदूषणाबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र वेळीच त्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे.
'सेव्ह पवई लेक' मोहीम
काही दिवसांपूर्वी पवई येथील स्थानिक रहिवासी आणि पर्यावरणप्रेमींनी पवई तालाव स्वच्छ आणि जलपर्णीमुक्त करण्यासाठी 'सेव्ह पवई लेक' ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान, जलपर्णीच्या वेढ्यातून पवई तलाव मुक्त करण्यासाठी सांडपाण्याच्या वाहिन्या अन्यत्र वळवण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला होता. याबरोबर तलावातील जलपर्णीही काढण्यात येत होती. तलावात दररोज प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडले जात असल्याबद्दल स्थानिक रहिवासी तसेच पर्यावरणप्रेमींनी खंत व्यक्त केली होती. त्याचबरोबर अनेक समस्यांचे निराकरण होण्यास मदत होईल, तसेच जोपर्यंत तलावात सोडण्यात येणारे सांडपाणी बंद होत नाही, तोपर्यंत हा लढा सुरू राहील असा निर्धार पर्यावरणप्रेमींनी केला आहे.