
मुंबई: मुंबई विमानतळावर एक मोठा विमान अपघात टळला आहे. एअर इंडियाचे कोचीहून निघालेले विमान मुंबई विमानतळावर लँडिंग करत असताना रनवेवरून अचानक घसरले. आज मुंबईत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे ही घटना घडली, यात कुठलीही जीवित हानी झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाचे विमान एआय २७४४ ए३२० (व्हीटी-टीवायए) हे सोमवारी मुंबई विमानतळावर उतरताना मुसळधार पावसामुळे धावपट्टीवरून भरकटल्याचा प्रकार समोर आला आहे. खराब हवामानामुळे विमान हे धावपट्टीवर उतरल्याबरोबर लगेच घसरले. सुदैवाने यावेळी मोठा अपघात टळला असून दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. हि घटना सकाळी साडे नऊच्या सुमारास घडली. हे विमान उतरत असताना त्याच्या तीन टायरांचा स्फोट झाला, इतकेच नाही तर इंजिनचे देखील नुकसान झाले असण्याची शक्यता आहे.
एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी सदर घटनेची माहिती देताना सांगितले की, २१ जुलै २०२५ रोजी कोच्चीहून मुंबईला येणाऱ्या फ्लाइट क्रमांक AI2744 चे लँडिंग होत असताना मुसळधार पावसामुळे लँडिंगनंतर विमानाला रनवेवरच चक्कर मारावी लागली. तरीही, विमान सुरक्षितपणे गेटपर्यंत पोहोचवण्यात आले आणि सर्व प्रवासी तसेच चालक दलाचे सदस्य सुरक्षितपणे विमानातून उतरले.
किरकोळ नुकसान
प्रवक्त्यांनी पुढे सांगितले की, मुख्य रनवे ०९/२७ मध्ये किरकोळ नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे, विमानतळावरील कामकाज सुरू ठेवण्यासाठी दुसरा रनवे १४/३२ कार्यान्वित करण्यात आला आहे. CSMIA मध्ये प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे.