पक्षनिष्ठेबाबत स्पष्टच बोलले शशी थरूर
नवी दिल्ली: काँग्रेस नेते आणि खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) वर मोदी सरकार आणि सैन्याला पाठिंबा देत म्हटले आहे की देशाची सुरक्षा कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा जास्त महत्त्वाची आहे. त्यांनी स्पष्ट केले की ते त्यांच्या पक्षाचा आदर करतात, परंतु त्याहून जास्त महत्वाचा भारत येतो.
थरूर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी सांगितले की कोची येथील एका शालेय विद्यार्थ्याने त्यांना राष्ट्रीय सुरक्षेबद्दल प्रश्न विचारला. थरूर म्हणाले, 'मी या विषयावर सार्वजनिकरित्या बोलणे टाळत असलो तरी, मला या प्रश्नाचे उत्तर देणे आवश्यक वाटले.'
जेव्हा देशाचा विचार येतो...
थरूर यांनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे ऊदाहरण देत म्हटले आहे की, 'जर देशच मेला तर कोण वाचेल?' ते म्हणाले की जेव्हा देशाचा विचार येतो तेव्हा आपण राजकीय मतभेद विसरून एकत्र उभे राहिले पाहिजे. शशी थरूर यांनी असेही म्हटले की, मोदी सरकारला पाठिंबा देण्याच्या त्यांच्या भूमिकेमुळे अनेक लोक त्यांच्यावर जोरदार टीका करत आहेत. मात्र ते या भूमिकेवर ठाम राहतील कारण ते राष्ट्रीय हिताचे आहे.
राजकीय पक्षाआधी, भारत प्रथम येतो
केरळचे खासदार थरूर म्हणाले, 'राजकीय पक्ष हे देशाला चांगले बनवण्याचे माध्यम आहेत. पण जर एखादा निर्णय राष्ट्रीय हिताचा असेल तर त्याला पाठिंबा मिळाला पाहिजे. माझ्या मते, भारत प्रथम येतो.' थरूर यांनी कबूल केले की काही पक्षाचे नेते त्यांच्या विधानांवर नाराज आहेत. ते म्हणाले, 'मी सरकार आणि लष्कराला पाठिंबा दिल्यामुळे बरेच लोक माझी टीका करत आहेत, परंतु मी जे बोललो ते भारतासाठी योग्य आहे असे मला वाटते.'
ते म्हणाले की जेव्हा ते 'भारत' म्हणतात तेव्हा त्याचा अर्थ फक्त काँग्रेस किंवा कोणत्याही एका पक्षाचा नसून सर्व भारतीयांचा असतो. थरूर यांच्या मते, संसदेत शेकडो पक्ष असू शकतात, परंतु राष्ट्रीय सुरक्षेसारख्या मुद्द्यांवर सर्वांनी एकत्र आले पाहिजे.