सामाजिक संदेशावर आधारित चित्रपट १ ऑगस्टला प्रदर्शित
मुंबई: सामाजिक भान जपणारे दिग्दर्शक अरविंद भोसले यांच्या आगामी 'अवकारीका' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर अनावरण सोहळा रवींद्र नाट्यमंदिरात एका अनोख्या पद्धतीने पार पडला. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी स्वच्छतेवर आधारित पथनाट्य सादर करत या सोहळ्याला सुरुवात झाली, ज्याने उपस्थितांची मनं जिंकली. स्वच्छतेची सामाजिक गरज, कचऱ्यामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्य समस्या आणि त्यावरचे उपाय यावर हे पथनाट्य प्रभावीपणे भाष्य करत होते.
या सोहळ्याला चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अतिरिक्त पोलीस महासंचालक श्री. कृष्णप्रकाशजी प्रमुख पाहुणे म्हणून खास उपस्थित होते. त्यांनी 'अवकारीका' चित्रपटाच्या टीमच्या सामाजिक प्रश्नांबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या प्रयत्नांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.
रेडबड मोशन पिक्चर या बॅनर अंतर्गत निर्मित 'अवकारीका' हा चित्रपट १ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अरविंद भोसले यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे, तर भारत टिळेकर आणि अरुण जाधव यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. मनोज गायकवाड, अरविंद भोसले, मृणाल कानडे, गीता सिंग हे सहनिर्माते आहेत.
दिग्दर्शक अरविंद भोसले यांनी या चित्रपटामागील आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, "समाजाकडून दुर्लक्षित राहिलेला स्वच्छता आणि स्वच्छतादूतांचे आयुष्य हा नाजूक विषय मी 'अवकारीका' मधून समाजासमोर आणला आहे. सफाई कामगारांच्या आयुष्यात सकारात्मक बदल व्हावेत या उद्देशाने मी हा चित्रपट आणला आहे आणि हा विचार प्रत्येकापर्यंत पोहोचेल असा मला विश्वास आहे."
चित्रपटात स्वच्छता दूताची भूमिका साकारणारे अभिनेता विराट मडके यांनी सामाजिक भान जपणार्या या प्रोजेक्टचा भाग झाल्याचा आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, "स्वच्छता हा आज एक जागतिक प्रश्न आहे. वेळीच आपण आपली जबाबदारी घेतली नाही, तर मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल. या चित्रपटाच्या निमित्ताने अरविंद भोसले यांनी ही जबाबदारी घेतली, जी मला खूप महत्त्वाची वाटली."
निर्मात्यांनीही हा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. दैनंदिन आयुष्याशी निगडित अत्यंत महत्त्वाचा विषय मांडणारा हा चित्रपट समाजाला एक नवा दृष्टिकोन देईल आणि त्याला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
'अवकारीका' चित्रपटात विराट मडके यांच्यासोबत राहुल फलटणकर, रोहित पवार, विनोद खुरंगळे, पिया कोसुम्बकर, नितीन लोंढे, प्रफुल्ल कांबळे, स्नेहा बालपांडे तसेच बालकलाकार वैभवी कुटे, उन्नती माने, कार्तिकी बट्टे आदी कलाकार दिसणार आहेत.
चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि गीते अरविंद भोसले यांचीच आहेत. छायांकन करण तांदळे यांचे असून, संकलन अथर्व मुळे यांनी केले आहे. रेहमान पठाण सहदिग्दर्शक तर चेतन परदेशी कार्यकारी निर्माता आहेत. श्रेयस देशपांडे यांनी संगीत दिले असून, कैलास खेर, सुनिधी चौहान, ज्ञानेश्वर मेश्राम यांचे स्वर गीतांना लाभले आहेत. शैलेश रणदिवे कलादिग्दर्शक आहेत. हा सामाजिक संदेश देणारा आणि मनोरंजक चित्रपट प्रेक्षकांना कसा वाटतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.