
राज ठाकरे आज मीरा रोड शहराच्या दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे यांच्या हस्ते मीरा रोडमध्ये नित्यानंद नगर येथे मनसेच्या शाखेचं उद्घाटन झालं. त्यानंतर आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. या सभेत राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीविरोधात पुन्हा एकदा आवाज उठवला. तसेच महाराष्ट्रात इयत्ता पहिली ते पाचवी हिंदी सक्ती होऊ देणार नाही असा पवित्रा धरला. आणि त्यासाठी मग फक्त दुकानं नाही तर शाळा सुद्धा बंद पाडू असा मोठा इशारादेखील दिला.
काय म्हणाले राज ठाकरे?
"मुंबईतून घरातून निघालो आणि इथे पोहोचायला जवळपास २ तास लागले. मी दरवेळेला आपल्या लोकांना सांगतो की, स्वागतामुळे वाहतूक कोंडी होते आणि त्यामुळे इथे यायला वेळ होतो. आज इकडे मीरा भाईंदरला मी मुद्दामून आलो. त्यादिवशी तो घडलेला जो प्रसंग होता इथला, मीठाईवाल्याचा काहीतरी झाला तो भाग. कानावरती मराठी भाषा समजणार नाही तर कानाखाली बसणारच मराठी. विनाकारण काहीतरी काढत असतात", असं राज ठाकरे म्हणाले. तसेच त्या प्रसंगाची माहिती देताना त्यांनी पुढे सांगितले कि, "छोटा प्रसंग होता तो. मोर्चासाठी म्हणून माझे महाराष्ट्र सैनिक तिथे पाणी प्यायला गेले. तेव्हा माणसाने विचारलं की, कशासाठी मोर्चा काढताय, त्यांनी सांगितलं हिंदी सक्तीचं केलंय म्हणून. म्हणे, इथे तर हिंदीतच बोलतात म्हणे. सगळं हिंदत संभाषण सुरु होतं. त्या माणसाच्या अरेरावीमध्ये त्याच्या जी काही कानफटीत बसायचं ती बसली. लगेच इकडच्या व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला. तुमच्या कानफटात मारली होती का? अजून नाही मारली"
माझे तर सगळ्या भाषेवर प्रेम आहे
राज ठाकरे यांनी भाषणात माझं सर्व भाषांवर प्रेम आहे असे म्हंटले, ते म्हणाले, "बिहारमध्ये आजही ९९ टक्के मातृभाषा बोलतात, हिंदी बोलत नाहीत. हनुमान चालीसा अवधीमध्ये आहे, हिंदी नाही. मराठी भाषेचा इतिहास आपण समजून घ्यायला हवा. माझे तर सगळ्या भाषेवर प्रेम आहे, महाराष्ट्रात जेवढे नेते आहेत, त्यापेक्षा माझे हिंदी चांगली आहे,. याचे कारण माझे वडील... माझ्या वडिलांना उत्तम मराठी हिंदी, उर्दू येत होते. भाषा कधीच वाईट नसते पण आमच्यावर लादणार असाल तर नाही बोलणार.. लहान मुलांवर तर लादू देणारच नाही.."
महाराष्ट्रात राहताय तर शांतपणे राहा, मराठी शिका.
"विषय समजून न घेता, काय झालंय ते माहिती नसताना कुठल्यातरी राजकीय पक्षाच्या दबावाखाली येऊन तुम्ही बंद करणार असाल, तुम्हाला काय वाटलं मराठी व्यापारी नाहीयत? दुकानं बंद करुन किती काळ राहणार आहात? शेवटी आम्ही काहीतरी घेतलं तरंच दुकान चालणार ना? महाराष्ट्रात राहताय तर शांतपणे राहा, मराठी शिका. आमचं तुमच्याशी काही वावडं नाहीय. पण मस्ती करणार असाल तर महाराष्ट्राचा दणका बसणार म्हणजे बसणार, एवढं लक्षात ठेवा", असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.