
मुंबई: शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील ११ आणि जिंजी या १२ गड-किल्ल्यांना युनेस्कोकडून प्राप्त जागतिक वारसा (World Heritage) दर्जा मिळणे म्हणजे मराठा इतिहासाचा जागतिक महत्त्वाच्या ठिकाणी झालेला गौरव आहे. हे संपूर्ण भारतासाठी तसेच महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असल्याचे गौरवउद्गार केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंग शेखावत काढले.
सह्याद्री अतिथीगृह येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मिळालेल्या १२ गड किल्ल्यांना युनिस्कोने प्रदान केलेल्या जागतिक वारसा मानंकणाच्या निमित्ताने आयोजित कर्तव्यपूर्ती कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्याचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, सांस्कृतिक विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे पुरातत्त्व खात्याचे तेजस गर्गे फिल्म सिटीच्या स्वाती म्हशे यांची उपस्थिती होती. केंद्रीय मंत्री शेखावत म्हणाले, भारताच्या सांस्कृतिक संपदेचे जतन, आंतरराष्ट्रीय स्तरावर तिचे सन्मानास्पद स्थान आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचे महत्त्व सांगितले. महाराष्ट्राच्या या अमूल्य वारशाचे युनेस्कोने केलेले मानांकन म्हणजे संपूर्ण राष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेचा विजय आहे, असे ते म्हणाले. त्यांनी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही विशेष आभार मानले. राज्याचे सांस्कृतिक मंत्री ॲड. शेलार म्हणाले, राज्याच्या दृष्टीने हा क्षण अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेसाठी सर्वस्व अर्पण केले. हे गड-किल्ले फक्त लढाया आणि पराक्रमाची साक्ष नाहीत, तर जनकल्याणाची प्रेरणास्थळेही आहेत. त्यांनी या कार्यात योगदान दिलेल्या अधिकाऱ्यांचेही कौतुक केले.
यापुढेसुद्धा या गड-किल्ले आणि अन्य गड-किल्ल्यांचं पावित्र्य, स्वच्छता, सुशोभीकरण सरकार तर करेलच. जिथे एएसआय (ASI) आहे, तिकडे एएसआय करेल, जिथे पुरातत्व विभाग आहे, तिथे पुरातत्व करेल, पण या १२ गडकिल्ल्यांच्या बाबतीत प्रत्येक नागरिकाचं, प्रत्येक शिवभक्ताचेही कर्तव्य असल्याचे मंत्री शेलार यांनी सांगितले. महाराष्ट्रातील १२ गड-किल्ल्यांचा एकत्रित वारसात समावेश ऐतिहासिक आहे.यूनेस्कोमध्ये भारताच्या एकत्रित प्रयत्नांना यश आहे.सांस्कृतिक पुनर्जागरणाचा संदेश देणारा ऐतिहासिक टप्पा असून यापुढे संरक्षण, व्यवस्थापन आणि पर्यटन विकासाची जबाबदारी अधिक वाढली असल्याचे मंत्री शेलार यांनी सांगितले.
सांस्कृतिक विभागाचे अपर मुख्य सचिव खारगे यांनी यावेळी सांगितले की, सर्वांची जबाबदारी ही तेवढीच वाढली आहे. यापुढे गड किल्ल्यांची सुरक्षितेबरोबरच येणाऱ्या पर्यटकांना आणि आपल्या राज्यातील शिवभक्तांना त्यांनी आवाहन केले की, सर्वांनी या १२ गड किल्ल्यांना, भेट द्यावी. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच शाहीर प्रवीण फणसे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा सादर केला.