Saturday, August 16, 2025

श्रावणात दाढी आणि केस का कापू नयेत?

श्रावणात दाढी आणि केस का कापू नयेत?
मुंबई : श्रावण महिना आला की धार्मिक वातावरण निर्माण होतं. अनेकजण या काळात उपवास, व्रत आणि संयमाचं पालन करतात. याच दरम्यान एक परंपरा सातत्याने पाहायला मिळते ती म्हणजे या महिन्यात दाढी करणं आणि केस कापणं टाळणं. धार्मिक दृष्टिकोनातून ही गोष्ट समजण्यासारखी आहेच, मात्र त्यामागे काही वैज्ञानिक कारणंही दडलेली आहेत. पावसाळ्याच्या या काळात हवामानात आर्द्रता अधिक असते. त्यामुळे हवेत बॅक्टेरिया, विषाणू, आणि फंगल स्पोअर्स मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. अशा परिस्थितीत दाढी करताना किंवा केस कापताना त्वचेला सूक्ष्म जखमा होतात, ज्या सामान्यतः दिसत नाहीत. मात्र या जखमांमधून संसर्ग होण्याची शक्यता वाढते. त्वचेवर फोड, पुरळ, किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याचा धोका या काळात अधिक असतो. याशिवाय, पावसाळ्याच्या बदलत्या हवामानाचा परिणाम आपल्या त्वचेवर आणि केसांवरही होतो. दमट हवेमुळे त्वचा अधिक संवेदनशील होते. अशा संवेदनशील काळात केस कापणं किंवा दाढी करणं ही त्वचेसाठी अधिक त्रासदायक ठरू शकतं. त्यातून इम्युन सिस्टीम कमकुवत असताना संसर्गाची शक्यता अधिक वाढते. एक अजून महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, केस आणि दाढी हे नैसर्गिक रक्षण करणारे घटक आहेत. ते थेट वातावरणाचा परिणाम त्वचेवर होऊ देत नाहीत. दाढी असणं हे ओल्या हवामानात चेहऱ्याला थोडं उबदार ठेवण्यास मदत करतं. त्याचप्रमाणे, केस देखील डोक्याला थेट थंडीचा किंवा दमटपणाचा परिणाम होऊ देत नाहीत. म्हणूनच श्रावण महिन्यात दाढी किंवा केस न कापण्याची जुनी परंपरा ही केवळ धार्मिक श्रद्धेपुरती मर्यादित नसून, ती आरोग्यदृष्ट्याही उपयुक्त आहे .
Comments
Add Comment