
पुणे : काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप यांनी आज भाजपमध्ये अधिकृतपणे प्रवेश केला. भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सासवड येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. आगामी निवडणुकांपूर्वी काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे, कारण यामुळे पुरंदर हवेलीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून संजय जगताप भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. सासवड आणि जेजुरी येथील काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी जगताप यांना भेटून भाजपमध्ये प्रवेश करण्याची मागणी केली होती, त्यानंतर आज हा पक्षप्रवेश निश्चित झाला.
पक्षप्रवेशानंतर बोलताना संजय जगताप यांनी कार्यक्रमाला उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व आणि भाजपची साथ आपल्याला लाभली आहे. "जिथे विकास आहे, तिथे राजकारण नाही. इथे कोणत्याही शेतकऱ्याच्या डोक्यावर पाय देऊन विकास होत नाही, इथे विकास होतो. या विचारामुळेच मी भाजपमध्ये आलो आहे," असे त्यांनी नमूद केले. भाजपचा कार्यकर्ता म्हणून आपण आज प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले.

आनंदराज आंबेडकर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संयुक्तिक युतीची घोषणा मुंबई: राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल ...
आज ३ हजार प्रवेश करायचे होते, पण यादी कमी करून ३७८ प्रवेश झाले आहेत, असे जगताप यांनी सांगितले. ते म्हणाले, "फक्त संजय जगताप प्रवेश करत नाहीत, तर प्रत्येक कार्यकर्ता या ठिकाणी प्रवेश करत आहे." त्यांनी आपल्या स्वभावात दोष असल्याचे सांगत आपण कधीच वेळेवर येत नाही, अशी कबुली दिली.
पुरंदर तालुक्यातील पाणीप्रश्न आणि विमानतळाचा मोठा प्रश्न प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले. "विमानतळ पुरंदर तालुक्यातच होणार आणि योग्य ठिकाणी होणार, असा मी तुम्हाला शब्द देतो," असे आश्वासन त्यांनी दिले. कोणताही प्रकल्प शेतकऱ्यांच्या डोक्यावर पाय देऊन होत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाने सर्वसामान्यांच्या खात्यात पैसे देण्याचे काम केले आहे. सामाजिक समरसतेचे विचार आपल्याला भावले, म्हणूनच आपण पक्षप्रवेश करत असल्याचे त्यांनी सांगितले. "एखाद्याला पक्षात घेताना खूप अडचणी येतात, पण तुम्ही मला सामावून घेतले," असे म्हणत त्यांनी आभार मानले.
आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि पुणे महानगरपालिका निवडणुकीत आपल्या कुठल्याही कार्यकर्त्याची 'पाठ मातीला लागणार नाही', असा विश्वास त्यांनी दिला. "येणाऱ्या काळात आम्ही भाजपचा प्रचार आणि प्रसार करू. जी जबाबदारी द्याल, ती तळमळीने शेवटपर्यंत पार पाडण्याचे काम करेन," असे जगताप म्हणाले. तसेच, "येणाऱ्या काळात मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांना, पुरंदर हवेलीच्या जनतेला आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक परिवाराला सांगू इच्छितो की, कोणत्याही अन्यायाला आपण ठोसपणे आणि ताकदीने उभे राहण्याचे काम करू. संजय जगताप प्रत्येक भारतीय जनता पक्षाच्या परिवाराच्या मागे राहील, प्रत्येक शेतकऱ्याच्या मागे राहील, विकासाच्या बाबतीत कोणालाही राजकारण करू देणार नाही," असेही त्यांनी म्हटले. मागील दोन वर्षांत 'साडीने आमच्या पुरंदरला गुंडाळून टाकले,' असे म्हणत त्यांनी नाव न घेता विजय शिवतारे यांना टोला लगावला.