Sunday, August 24, 2025

Devendra Fadnavis : राजेंच्या गडकिल्ल्यानंतर मुंबईकरांसाठी आणखी एक खुशखबर, मुंबई सेंट्रलला देणार यांचं नाव...

Devendra Fadnavis : राजेंच्या गडकिल्ल्यानंतर मुंबईकरांसाठी आणखी एक खुशखबर, मुंबई सेंट्रलला देणार यांचं नाव...

मुंबई : आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवरायांच्या एकूण १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या वारसा यादीत स्थान मिळाल्याने विधानसभेत निवेदन केलं. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत देशभरातील १२ गडकिल्ल्यांचा समावेश झाला आहे. यात महाराष्ट्रातील ११ किल्ले आहेत. महाराष्ट्रासाठी ही अभिमानास्पद बाब आहे. महाराष्ट्रातील ११ आणि तमिळनाडूतील एक जिंजी असे एकूण १२ गडकिल्ले आहेत. “युनेस्कोच्या यादीत समाविष्ट होणे ही महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. पंतप्रधानांचे मी आभार मानतो. पंतप्रधानांकडे ७ प्रस्ताव गेले होते. मात्र, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचा प्रस्ताव मंजूर केला” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात म्हणाले.

“इतरांनी किल्ले हे महसुली गोळा करण्यासाठी वापरले. मात्र महाराजांनी हे किल्ले स्वराज्यासाठी वापरले. युनोस्कोचे मुख्यालय पॅरिस येथे सादरीकरण झालं. मी आणि माझे सहकारी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या संदर्भात भेट घेतली होती. यामध्ये मतदानाचा अधिकार २० देशांना असतो. या प्रस्तावावर सर्व २० देशांनी एकमताने निवड केली” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“राजमुद्रा याचा विचार त्यांनी समजून घेतला आणि काळाच्या पुढचा विचार असल्याचं त्यांना दिसलं. या कार्यात मदत केलेले सर्वांचे, पंतप्रधान आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेचे मी अभिनंदन करतो” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुंबई सेंट्रल स्टेशनला कोणाचं नाव?

“सीएसटीएमच अतिभव्य स्टेशन तयार करण्याच काम सुरु आहे. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा बसवला जाणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने याचा आधीच विचार केला आहे. नाना जगन्नाथ शंकर शेठ यांचं नाव मुंबई सेंट्रल स्टेशनला द्यावं, असा प्रस्ताव एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना पाठवला आहे. निर्णयासाठी हा प्रस्ताव त्या ठिकाणी आहे” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

कुठल्या १२ किल्ल्यांचा समावेश?

शिवरायांच्या एकूण १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या वारसा यादीत स्थान मिळाल्याने शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यासह रायगड, राजगड, प्रतापगड, शिवनेरी, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी, जिंजी या किल्ल्यांचाही समावेश UNESCO यादीत करण्यात आला आहे. हा भारतासाठी, विशेषतः महाराष्ट्रासाठी एक अत्यंत अभिमानाचा क्षण आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीने बांधलेल्या या किल्ल्यांचे सामरिक, स्थापत्य आणि सांस्कृतिक महत्त्व आता जागतिक स्तरावर अधोरेखित झाले आहे. ११ जुलै २०२५ रोजी पॅरिसमध्ये झालेल्या जागतिक वारसा समितीच्या ४७ व्या सत्रात ‘मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया’ अंतर्गत सिंधुदुर्ग किल्ल्याचा समावेश करण्यात आला.

Comments
Add Comment