सना: येमेनी नागरिकाच्या हत्येप्रकरणी दोषी सिद्ध झालेली केरळची नर्स निमिषा प्रियाला येमेनमध्ये १६ जुलै रोजी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यामुळे तिला वाचवण्यासाठी तिचे कुटुंब आणि भारताकडून केले जाणारे प्रयत्न आता संपुष्टात आले आहेत. कारण, निमिषाला वाचवण्यासाठी शेवटचा उपाय म्हणून 'ब्लड मनी' ची आशा देखील आता धूसर झाली असल्या कारणामुळे, या प्रकरणात सरकारला फार काही करता येणार नसल्याचे भारत सरकारने सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केलं आहे.
येमेनमध्ये दिली जाणार फाशी
निमिषाला १६ जुलै रोजी येमेनमध्ये फाशी दिली जाण्याची शक्यता आहे. तलाल अब्दो महदी नावाच्या येमेनी नागरिकाच्या हत्येप्रकरणी तिला दोषी ठरवण्यात आलं आहे.
सरकार फार काही करू शकत नाही!
अटर्नी जनरल आर. वेंकटरमणी यांनी कोर्टात सांगितलं की, भारत या प्रकरणात जितकं पुढे जाऊ शकत होतं, तितकं गेलं आहे आणि सरकार आपल्या मर्यादेपर्यंत पोहोचलं आहे. सरकार आता फार काही करू शकत नाही. येमेनच्या संवेदनशीलतेला पाहता, हे प्रकरण राजनैतिक दृष्ट्या हाताळणे योग्य नाही. ब्लड मनी हा एक खासगी करार आहे."
काय आहे ब्लड मनी?
ब्लड मनी या व्यवस्थेनुसार, दोषीच्या वतीने पीडित कुटुंबाला एक ठराविक रक्कम दिली जाते. विशेषतः अनवधानाने झालेल्या हत्येच्या प्रकरणात असं घडतं. यानंतर पीडित कुटुंबावर अवलंबून असतं की, ते दोषीला माफ करतात की नाही.
इस्लामिक कायद्यानुसार, गुन्ह्याच्या पीडितांना गुन्हेगारांना कशी शिक्षा द्यावी, याबद्दल आपलं मत देण्याचा अधिकार असतो. हत्येच्या प्रकरणात हे पीडित कुटुंबाला लागू होतं. हत्येच्या प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावता येते, पण जर पीडित कुटुंबाची इच्छा असेल, तर एका ठराविक रकमेच्या बदल्यात दोषीला माफी देण्याचा पर्यायही निवडता येतो. याला दिया प्रथा असंही म्हणतात. ही रक्कम किती असावी, हे दोन्ही पक्ष मिळून ठरवतात. पण निमिषाच्या प्रकरणात तलालच्य कुटुंबाने ब्लड मनी नाकारली असल्याकारणामुळे तिच्या सुटकेच्या आशादेखील यासोबत संपुष्टात आल्या आहेत.