Sunday, August 3, 2025

सिंधुदुर्ग, विजयदुर्ग किल्ले युनेस्को यादीत; पंतप्रधान मोदींच्या पाठबळामुळेच

सिंधुदुर्ग, विजयदुर्ग किल्ले युनेस्को यादीत; पंतप्रधान मोदींच्या पाठबळामुळेच

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री खासदार नारायण राणे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मानले आभार


कणकवली : केंद्र व राज्य सरकारच्या पातळीवर समन्वयाने काम करत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले सिंधुदुर्ग आणि ऐतिहासिक आरमाराची राजधानी असलेला विजयदुर्ग किल्ला यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याची अधिकृत घोषणा झाली आहे. हा निर्णय प्रत्येक शिवप्रेमी आणि सिंधुदुर्गवासीयांसाठी अभिमानाची बाब ठरली आहे. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल बोलताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, “शिवरायांच्या विचारांवर चालणारा खरा मावळा म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. त्यांनी हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. यासाठी मी त्यांचे मन:पूर्वक आभार मानतो.” असे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले.


यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशीष शेलार यांनीही सातत्याने पाठपुरावा केला. तसंच, खासदार नारायण राणे यांनीही केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार करून या विषयास गती दिली, अशी माहिती मंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.“शिवरायांच्या स्थापत्यकलेचा वारसा जपणे आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे. या यादीत समावेश झाल्यामुळे किल्ल्यांचे संवर्धन, पर्यटन वाढ, आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जागतिक पातळीवर गौरव होणार आहे. देश-विदेशातील पर्यटकांची संख्या आता वाढेल,” असेही राणे म्हणाले. तसेच, “राज्य सरकार जनहिताचे निर्णय घेत आहे. हे निर्णय जनतेपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार काय काम करत आहे, हे विरोधकांनी समजून घेतले पाहिजे,” असे स्पष्ट शब्दांत राणे यांनी विरोधकांना सुनावले.



वाढवण बंदरात पहिल्या टप्प्यात ५ ते ७ हजार नोकऱ्या उपलब्ध होणार



  • पालघर जिल्ह्यात होत असलेल्या वाढवण बंदराचा फायदा सिंधुदुर्गलाही होणार आहे. पहिल्या टप्प्यात ५ ते ७ हजार नोकऱ्या उपलब्ध होतील. त्यासाठी ज्या जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे, त्यात सिंधुदुर्गचा समावेश आहे. वाढवण बंदरात निर्माण होणाऱ्या रोजगारासाठी ट्रेनिंग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आयटीआयमध्ये दिले जाणार आहे. या ट्रेनिंगसाठी राज्य सरकारने १२० कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे साहजिकच सिंधुदुर्गातील युवकांच्या हाताला रोजगार मिळणार आहे, असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, महायुतीच्या राज्य सरकारला दीडशे दिवस पूर्ण होत असतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण- तरुणींना रोजगाराची नवीन दालने उघडली जात आहेत.

  • वीजवितरणच्या प्रलंबित कामांसाठी ७०कोटी, चिपी विमानतळ सुशोभीकरणसाठी १ कोटी दिले आहेत. जिल्ह्यात पोलीस दल सक्षम होण्यासाठी जिल्ह्याभरात सीसीटीव्हीचे जाळे बसवणार आहोत. पालकमंत्री म्हणून सिंधुदुर्ग जिल्हावासीयांच्या विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी सिंधुदुर्गचा प्रतिनिधी म्हणून मी प्रयत्न करत असल्याचेही नामदार नितेश राणे यांनी सांगितले.


Comments
Add Comment