भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून संभ्रम दूर
मुंबई : येत्या ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. महायुती एकत्रित लढणार असल्याचे सांगत महायुती एकत्र निवडणूक लढणार की स्वबळावर याबाबतचा संभ्रम संभ्रम भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दूर केला आहे.
त्यातच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्रित या निवडणुका लढण्याचे संकेत मिळत असल्याने राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे, तर दुसरीकडे महायुतीनेही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पण भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना निवडणुकांबाबत भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी महायुती म्हणूनच महापालिका निवडणुका लढवणार असल्याचे जाहीर केले. महापालिका निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. त्या महायुती म्हणूनच लढवल्या जातील.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात अधिवेशन संपल्यावर प्रत्येक विभागात आम्ही जाणार आहोत. कार्यकर्ते आणि जिल्ह्याच्या टीमशी संवाद साधणार आहोत. भेटीगाठी होणार आहेत. कार्यकर्ता आणि नेता एकत्र चर्चा करतील. येणाऱ्या काळात महायुतीचे चांगले वातावरण करू आणि सर्व महापालिकांच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढू. मुंबई ठाणे पालिकेच्याही लढू. आम्हाला वातावरण पोषक आहे. त्यामुळे एकत्र लढण्याचे ठरवले आहे, असे रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.
हिंदीबाबतचा संभ्रम कोणात नाही. फक्त राज आणि उद्धव ठाकरेंमध्ये संभ्रम आहे. त्यांचा संभ्रम दूर करण्याचा सरकारने प्रयत्न केला आहे. पण त्यांनी हा मुद्दा निवडणुकीचा केला असेल तर त्याला काही करू शकत नाही. वाहिन्यांनीही त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. एखादा मुद्दा किती वेळ चालवावा यासाठी समिती स्थापन केली आहे. समिती या संदर्भातील अभ्यास करून अहवाल तयार करणार आहे. विधानसभेत तो पाठवेल, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली.
महापौरपदाचा निर्णय मुख्यमंत्रीच घेणार
मुंबई महापालिकेच्या फॉर्म्युल्यावर वरिष्ठ पातळीवर त्यांची, आमची कोअर टीम बसून चर्चा करतील. जागा वाटपाचे सूत्र ठरवतील. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार एकत्र बसून जागा वाटप ठरवतील. या नेत्यांचा राजकारणातील प्रदीर्घ अनुभव आहे. तेच जागा वाटपाचे सूत्र ठरवतील, असे सांगतानाच महापौर पदाबाबतचा निर्णय त्यावेळी होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरवले तर महापौरपद एकनाथ शिंदे गटाला देऊ, असे रवींद्र चव्हाण यावेळी म्हणाले.