
करिअर : सुरेश वांदिले
दरवर्षीपेक्षा यंदाच्या १२ वी च्या निकालाची टक्केवारी कमी असली तरी विज्ञान, कला आणि वाणिज्य शाखेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या लाखावर जाते. जेईई-मेन आणि जेईई ॲडव्हान्स्डचा निकाल लागल्यामुळे, १२ वीमध्ये विशिष्ट टक्केवारी मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा, आयआयटी (इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) एनआयटी (नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी), आयआयआयटी (इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) आणि देशातील इतर संस्थांमधील प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. बऱ्याच खासगी अभियांत्रिकी महाविद्यालातील अखिल भारतीय स्तरावरील १५ ते २० टक्के जागा, जेईई-मेनच्या गुणांचा आधार घेऊन भरल्या जातील. देशातील काही नामवंत अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान शिक्षण संस्थांच्याही चाळणी परीक्षांचे निकाल लागले आहेत. त्यामुळे गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयांसह १२वी उत्तीर्ण झालेल्या बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा मार्ग सुकर झाला असे म्हणता येईल. महाराष्ट्र शासनाच्या अभियांत्रिकी/ तंत्रज्ञान सीईटीचा निकालही मागच्या पंधरवाड्यात लागला आहे. या गटातील हजारो विद्यार्थी, राज्यातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी पात्र ठरतील. काही विद्यार्थी औषधी निर्माणशास्त्र अभ्यासक्रमाला जातील. काही कृषी अभ्यासक्रमाला जातील. ज्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळणार नाही ते, आपल्या शहरातील किंवा मुंबई, पुणे नागपूर, नाशिक कोल्हापूर यांसारख्या मोठ्या शहरांमधील विज्ञान महाविद्यालयात बीएस्सीला प्रवेश घेतील.
नीट परीक्षा आणि सीईटी जीवशास्त्र गटाचा निकालही लागल्याने आणखी काही हजार विद्यार्थी, एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएचएमएस, फिजिओथेरपी, ऑक्युपेशलन थेरपी, नर्सिंग, पॅरॉमेडिकल अभ्यासक्रम या अभ्यासक्रमांसाठी पात्र ठरतील. उर्वरित बीएस्सी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतील किंवा बऱ्याच जणांनी असा प्रवेश घेतलाही असेल. याचा अर्थ विज्ञान शाखेतील बहुतांश विद्यार्थ्यांना, कोणत्या ना कोणत्या ना महाविद्यालयात प्रवेश मिळेल.