
मुंबई : मुंबईतील रेल्वे स्थानकांसह महत्वाच्या ठिकाणी फेरीवाल्यांवर पोलिस आणि महापालिकेच्यावतीने संयुक्तपणे कारवाई सुरु असली तरी प्रत्यक्षात बोरीवली वगळता कुठेही ठोस कारवाई दिसून येत नाही. दादर पश्चिम रेल्वे स्थानकाच्या परिसरातही ही कारवाई सुरु असली तरी फारशी कडक कारवाई दिसून येत नाही. रेल्वे स्थानकाला विळखा आणि दुरवर कारवाई केली जात असल्याने आग रामेश्वरी अन बंब सोमेश्वरी असाच प्रकार दिसून येत आहे.
मुंबई महापालिकेच्यावतीने रेल्वे स्थानकांसह २० ठिकाणे फेरीवाला मुक्त करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पोलिस आयुक्तपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर देवेन भारती यांनी पोलिसांना सूचना देत सर्व रेल्वे स्थानके फेरीवाला मुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे ६ मे २०२५ पासून दादर पश्चिम रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त करण्याच्या कारवाईला सुरुवात झाली. मात्र, महापालिका आणि पोलिस यांच्या माध्यमातून कारवाई सुरु असली तरी प्रत्यक्षात या कारवाईचा प्रभाव दिसून येत नाही. स्थानक रोड असलेल्या न्यायमूर्ती रानडे मार्गांवर कारवाई केली असेल तर स्थानकाबाहेर तसेच डिसिल्व्हा मार्ग आणि जावळे मार्गावर फेरीवाले हे ठाम मांडून व्यवसाय करताना दिसतात. मात्र दीडशे मीटर बाहेरील एन सी केळकर मार्गावर कारवाई केली जाते. एवढेच काय तर रात्री साडेसात नंतर तर रेल्वे स्थानकाला पुन्हा फेरीवाल्यांचा विळखा घातला जातो आणि पुलाखालील भाग आणि स्थानकाच्या भिंती खेटून तसेच प्रवेशद्वाराजवळच फेरीवाले बसून व्यवसाय करत असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास होत असतानाही या फेरीवाल्यांवर कारवाई केली जात नाही.