Friday, July 11, 2025

श्रावणाची चाहूल, भाज्यांचे दर कडाडले

श्रावणाची चाहूल, भाज्यांचे दर कडाडले

टोमॅटो, फ्लॉवरचे भाव दुप्पट, तर कोथिंबिरीचे दर घसरले


पेण(स्वप्नील पाटील) : अवघ्या दोन आठवड्यांवर श्रवण महिना आला असल्याने पेणच्या घाऊक बाजारात भाज्यांचे दर कडाडले आहे. त्यामुळे गृहिणीचे दैनंदिन बजेट कोलमडले आहे. सतत पडत असणारा पाऊस आणि त्यामुळे भाज्यांचे झालेले नुकसान लक्षात घेता आवक घटल्याने भाज्यांचे दर जवळपास दुपटीने वाढले आहे. तर कोथिंबीरचे दर काही प्रमाणात कमी झाले आहे. त्यामुळे बऱ्याच गृहिणी बाजारात गेल्यानंतर आवर्जून कोथिंबीर घेत आहे आणि पावसाळ्यात चहा सोबत गरमागरम कोथिंबीर भजी, कोथिंबीर वड्या करायला पसंती देत आहे. दरम्यान हे वाढलेले दर पाहता श्रवण महिना संपेपर्यंत म्हणजेच किमान एक ते दीड महिना तरी असेच राहतील असा अंदाज भाजी विक्रेते वर्तवित आहेत.


पावसाळा सुरू झाला की या दरम्यान येणाऱ्या रानभाज्या अजून तरी पाहिजे तशा आल्या नाहीत, त्यामुळे अनेक नागरिक दैनंदिन भाज्यांचा सर्रास वापर करत आहेत. त्यातच पाऊस सुरू झाला असल्याने भाज्यांचे नुकसान होत आहे. साहजिकच हे नुकसान होत असल्याने भाज्यांची मागणी तीच मात्र पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने हे भाज्यांचे दर वाढले असल्याचे भाजी विक्रेते सांगत आहेत.



भाज्यांचे एक किलोमागे किरकोळ दर


टोमॅटो ४० रुपये, फ्लॉवर १२० रुपये, कोबी ५० रुपये, मिरची ८० रुपये, दुधी ६० रुपये, शेवगा १२० रुपये, शिमला १२० रुपये, आलं ८० रुपये, तोंडली १२० रुपये, शिराळे १२० रुपये, कारले १२०रुपये, वांगी ८० रुपये, गवार १२० रुपये.


पावसाळा सुरू झाला की बाजारात रानभाज्या येतात, मात्र अजून तरी हव्या तशा या भाज्या आल्या नसल्याने दररोज बाजारात उपलब्ध असणाऱ्या भाज्यांकडे आमचा कल आहे. परतू मागणीनुसार पुरवठा कमी असल्याने भाज्यांचे दर वाढले आहे. त्यामुळे आमचे बजेट कोलमडले आहे. नीलम म्हात्रे, गृहिणी

Comments
Add Comment