
IND vs ENG: भारत आणि इंग्लंडमधील तिसरा कसोटी सामना लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर सुरू आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जो रूटने इंग्लंडसाठी पहिल्या डावात शतक झळकावले. रूटच्या कसोटी कारकिर्दीतील हे ३७ वे शतक होते. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी (११ जुलै) मैदानावर गोंधळ झाला. हा गोंधळ ड्यूक्स चेंडूच्या आकाराबाबत होता.
भारतीय खेळाडू चेंडूच्या आकारावर नाराज होते आणि त्यांनी पंचांकडे त्याबद्दल तक्रार केली. भारताने चेंडूचा आकार योग्य नसल्याचा दावा केला. त्यामुळे पंचांनी चेंडू तपासण्यासाठी 'रिंग टेस्ट' केली. परंतु चेंडू त्या रिंगमधून बाहेर पडला नाही, ज्यामुळे चेंडू खराब झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर, एक नवीन चेंडू मागवण्यात आला, परंतु भारतीय कर्णधार शुभमन गिलला तो देखील आवडला नाही. मैदानात पंचासोबत तो जोरजोरात बोलताना दिसून आला. शुभमन गिल पंचांशी बोलत असताना तो खूप रागावलेला दिसत होता. तथापि, पंचांनी त्याचे युक्तिवाद फेटाळून लावले. स्टंप माइकवर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचा आवाजही ऐकू आला. 'हा १० षटकांचा जुना चेंडू आहे का? खरंच?' असे सिराजचे बोलणे ऐकू आले. भारतीय खेळाडूंच्या सततच्या विनंतीनंतर, पंचांनी ९९ व्या षटकात पुन्हा एकदा चेंडू बदलण्याचा निर्णय घेतला. ही संपूर्ण घटना इंग्लंडच्या डावातील ९१ व्या षटकात घडली.
पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत सध्या १-१ ने बरोबरी
भारत आणि इंग्लंडमधील पाच सामन्यांची कसोटी मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. कसोटी मालिकेचा पहिला सामना लीड्समधील हेडिंग्ले क्रिकेट मैदानावर खेळवण्यात आला होता, ज्यामध्ये इंग्लंडने ५ विकेट्सने विजय मिळवला होता. त्यानंतर बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन मैदानावर खेळवण्यात आलेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने ३३६ धावांनी विजय मिळवला.