
मुंबई: पावसाळ्याच्या दिवसांत साचलेल्या पाण्यामुळे डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती वाढली असून राज्यात अनेक ठिकाणी डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहे. दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर डेंग्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढते. त्यामुळे या आजाराच्या बचावासाठी आरोग्य प्रशासनातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
डेंग्यूच्या नियंत्रणासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत प्रसिद्धी व जनजागरण मोहीम राबविणे सातत्याने सुरु आहे. आरोग्य विभागातर्फे विविध शासकीय व खाजगी संस्थाना या आजाराच्या खबरदारीबरोबरच संशयित रुग्ण आढळल्यास त्वरित कळविण्याचे पत्र देण्यात आले आहे. तसेच संशयित रुग्णांचे रक्तजल नमुने तपासणीला पाठवून रुग्ण आढळल्यास त्वरित औषधोपचार केले जात असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
ताप आल्यास त्वरित जवळच्या सरकारी रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांना कळविणे, रक्तजल नमुन्याची तपासणी करून खात्री करणे, आवश्यक ठिकाणी धूर फवारणी, डास उत्पत्ती स्थाने नष्ट करणे, पाण्याची डबकी बुजविणे, साचलेल्या पाण्यात डास अळी भक्षक गप्पी मासे सोडणे, निरुपयोगी टायर, मोकळे डबे, नारळाच्या करवंटी, पाण्याच्या बाटल्यांची विल्हेवाट लावणे, एडीस डास दिवसा चावत असल्याने लहान मुलांना मच्छरदाणीत झोपविणे हे उपाय करणे गरजेचे आहे.
ही आहेत लक्षणे
एकाएकी तीव्र ताप व डोकेदुखी, स्नायू व सांधेदुखी, उलट्या होणे, तीव्र डोळेदुखी, अशक्तपणा येणे, भूक मंदावणे, जास्त तहान लागणे, तोंडाला कोरड पडणे, ताप कमी जास्त होण, अंगावर पुरळ येणे, त्वचेखाली व नाकातून रक्तस्त्राव होणे, रक्ताची उलटी होणे, रक्त मिश्रित किंवा काळसर रंगाची सौचास होणे, पोट दुखण्यासारखी लक्षणे डेंग्यु झालेल्या रुग्णामध्ये आढळून येतात.