
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात इतिहासातील काळी प्रकरणे संपली पाहिजेत, त्याच्या खुणा मिटल्या पाहिजेत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. पंतप्रधान मोदींनी मांडलेल्या या विचाराला अनुसरुन कर्नाक पुलाचे नाव बदलले. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानातील अतिरेकी तळ नष्ट केले. भारत पाकिस्तानात घुसून अतिरेकी तळ नष्ट करू शकतो हे दाखवून देण्यात आले. भारतीय सैन्याच्या या अतुलनीय कामगिरीमुळे सर्वांच्या मते महापालिकेने पुलाला ‘सिंदूर’ नाव दिले, याचा मला आनंद आहे. या पुलाची एकूण लांबी ३४२ मीटर असून रेल्वेच्या हद्दीत ७० मीटरचा भाग आहे. मुंबईतल्या वाहतुकीसाठी हा पूल उपयुक्त आणि सहाय्यक आहे; असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. रेल्वेवरचा पूल असल्याने आणि दाटीवाटीच्या ठिकाणी असल्याने अडचणींवर मात करून मुंबई मनपाने कमी वेळात ऐतिहासिक जुन्या कर्नाक पुलाचे उत्कृष्ट बांधकाम केल्याने मुख्यमंत्र्यांनी मनपाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.
असा आहे सिंदूर पूल
दक्षिण मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मशीद बंदर आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीसाठी सिंदूर पूल महत्त्वाचा आहे. मशीद बंदर परिसरात पूर्व आणि पश्चिम परिसर जोडणारा विद्यमान मार्ग कायम ठेवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने या पुलाची पुनर्बांधणी केली आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने मंजूर केलेल्या आराखड्यानुसार सिंदूर पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. मुंबई शहराच्या दक्षिणेतील पी. डी’मेलो मार्गाकडील बंदर भाग आणि क्रॉफर्ड मार्केट, काळबादेवी, धोबी तलाव या भागांना रेल्वे मार्गावरुन पूर्व-पश्चिमेला जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणजे सिंदूर पूल. पुलाच्या पुनर्बांधणीमुळे दहा वर्षांपासून बाधित असलेली पूर्व-पश्चिम वाहतूक सहजतेने होण्यास मदत होणार आहे. पूल कार्यान्वित झाल्यावर पी. डी’मेलो मार्ग विशेषतः वालचंद हिराचंद मार्ग व शहीद भगत सिंग मार्ग यांच्या छेदनबिंदूवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. पुलाच्या पुनर्बांधणीने युसुफ मेहरअली मार्ग, मोहम्मद अली मार्ग, सरदार वल्लभभाई पटेल मार्ग, काझी सय्यद मार्ग यावरील वाहतूक सुलभ होणार आहे.