
मुंबई : गणेशोत्सव हा राज्याचा उत्सव म्हणून घोषित करणार असल्याची मोठी घोषणा राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी अधिवेशनात केली. राज्यात गणेशोत्सवावर असलेले निर्बंध हटवून गणेशोत्सवाची व्याप्ती वाढवण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा आहे. गणेशोत्सवात नियमांची आडकाठी येऊ नये यासाठी सरकार प्रयत्न करतंय. गणेशोत्सव हा राज्याचा स्वाभिमान आहे असंही आशिष शेलार म्हणाले.
१८९३ रोजी लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्राचा गणेशोत्सव सुरु केला. गणेशोत्सवाला सामाजिक, राष्ट्रीय आणि स्वतंत्रता, स्वाभिमान, स्वभाषा याच्याशी संबंधित अशी पार्श्वभूमी आहे. गौरव आणि अभिमान असलेला गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्याचा महोत्सव म्हणून राज्य सरकार घोषित करेल असं राज्याच्या पावसाळी अधिवेशनात राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी सांगितलं.

मुंबई : महायुती सरकारमधील शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस आली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील एका कार्यक्रमात बोलताना संजय ...
एका निवृत्त न्यायाधीशांच्या माध्यमातून चाललेल्या निवाड्यात पोलिसांनी परवानगीच देऊ नये, रस्ते मैदाने, नागरी वस्त्या निर्माण व्हायच्या आधी गणेशोत्सव होता त्यात आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला. त्या निवाड्यात न्यायालयासमोर गणेशोत्सव, हिंदू सण याबाबत फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका घेतली. शेवटी हायकोर्टाच्या पीठासमोर ठाम भूमिका घेतली. न्यायालयाच्या विरोधात भूमिका घेऊन त्यांनी गणेशोत्सवासाठी प्रयत्न केला. राज्यात १०० वर्षांच्या परंपरेला एक वर्ष खंडित कुणी केलं असेल तर तत्कालीन आधीच्या मुख्यमंत्र्यांनी केलं. त्यावर्षी लालबागचा राजाही बसला नाही. कोरोनामुळे गर्दीचं कारण सांगण्यात आलं होतं असं म्हणत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टीका केली.
देशात नव्हे तर जगात या गणेशोत्सवाची व्याप्ती
देशात नव्हे तर जगात या गणेशोत्सवाची व्याप्ती, संस्कृती, प्रवृत्ती आणि प्रचार यासाठी सरकार कटिबद्ध राहील असं आशिष शेलार म्हणाले. काही लोकांनी गणेशोत्सवाच्या सार्वजनिक परंपरेला कुठे ना कुठे परंपरागत गणेशोत्सवाला बाधा निर्माण होईल असा प्रयत्न केला. पण महायुतीचं सरकार सगळ्या निर्बंधांना, स्पीड ब्रेकरना बाजूला करण्यासाठी शिघ्रतेनं काम केलं. पीओपीच्या बाबतीतही पर्यावरणपूरक गणपती असायला हवा. पीओपी घातक आहे की नाही यासाठी अहवाल दिला आणि निर्बंध हटवले. पीओपी मुर्त्यांना परवानगी मिळाली. विसर्जनाचा मुद्दा आहे त्याबाबतही बैठक घेतली. जलस्रोत प्रदुषित होऊ नयेत पण परंपरागत समुद्रात होणारं विसर्जन यासंदर्भात धोरण न्यायालयासमोर मांडत आहोत असं आशिष शेलार यांनी सांगितले.
व्यवस्थेकरता लागेल तेवढा निधी सरकार देणार : आशिष शेलार
पोलीस विभाग असेल, आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चरचा खर्च, पुणे-मुंबईतला महोत्सव यासाठी लागेल तेवढा निधी या व्यवस्थेकरता खर्च सरकार करेल. सर्व गणेशोत्सव मंडळांना विनंती आहे की, सामाजिक उपक्रम, देशानं जे कमावलंय, महापुरुष यांच्या देखाव्यांचा विचार करावा. पर्यावरणपूरक असा गणेशोत्सव म्हणून राज्याचा उत्सव घोषित करण्यास आनंद होतोय असंही सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी सांगितलं.