लंडन: भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडच्या भूमीवर एक नवा अध्याय लिहिला आहे. चौथ्या टी-२० सामन्यात इंग्लंडला पराभूत करत, भारतीय महिला संघाने इंग्लंडमध्ये पहिल्यांदाच टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका जिंकण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला आहे. भारतीय महिला क्रिकेटसाठी हा खरोखरच एक अविस्मरणीय क्षण ठरला आहे.
भारताचा दणदणीत विजय, मालिकेत ३-१ ची आघाडी!
भारत आणि इंग्लंड महिला संघादरम्यान खेळल्या जात असलेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील चौथ्या सामन्यात भारताने धमाकेदार कामगिरी केली. इंग्लंडचा ६ विकेट्सने धुव्वा उडवत भारतीय संघाने मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारतीय महिला क्रिकेटपटूंनी आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करत, फलंदाज आणि गोलंदाज दोघांनीही विजयात मोलाची भूमिका बजावली.
लॉर्ड्स: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून सुरूवात होत आहे. लॉर्ड्सच्या मैदानावर हा ...
मानधना, शेफालीचा जलवा; हरमनप्रीत-जेमिमाचा संयमी खेळ!
इंग्लंडने विजयासाठी ठेवलेल्या १२७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय महिला संघाने आक्रमक सुरुवात केली. स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांनी सुरुवातीलाच तुफानी फटकेबाजी करत ७ षटकांत ५६ धावांची शानदार सलामी दिली आणि सामन्यावर आपली पकड मजबूत केली. स्मृतीने ३२ धावा केल्या तर शेफालीने ३१ धावांचे योगदान दिले. त्यानंतर जेमिमा रॉड्रिग्ज (नाबाद २४ धावा) आणि कर्णधार हरमनप्रीत कौर (२६ धावा) यांनी संयमी खेळ करत भारताचा विजय निश्चित केला.
भारतीय महिला संघाने हे आव्हान केवळ १७ षटकांतच पूर्ण करत इंग्लंडमध्ये ऐतिहासिक टी-२० मालिका नावावर केली.