वारीदरम्यान ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ

सोलापूर : आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी भक्तांना सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत 'भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ या उपक्रमांतर्गत ९ लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांना विनामूल्य आरोग्य तपासणी आणि औषधोपचारात्मक आरोग्य सेवा पुरविण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष उपक्रमाच्या माध्यमातून आरोग्य विभागाने ९ लाख २३ हजार ५०९ वारकऱ्यांना आतापर्यंत आरोग्य सेवा पुरविली असून, परतीच्या वारीमध्येही १० जुलैपर्यंत विभागामार्फत वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरविण्यात येणार आहे. पालखी मार्गावर १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेमार्फत आतापर्यंत एकूण १,११४ वारकऱ्यांना अत्यावश्यक आरोग्य सेवा पुरविण्यात आलेली आहे. त्यामुळे या वारकऱ्यांना जीवनदान मिळाले आहे.


संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीसह राज्यातील विविध जिल्ह्यांतून आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला निघालेल्या संतांच्या पालख्या आणि दिंड्यांमध्ये सहभागी झालेल्या लाखो वारकऱ्यांना रस्त्यात काही त्रास जाणवला की लगेच उपचार मिळावेत, यासाठी आरोग्य विभागाने 'भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची' या उपक्रमाच्या माध्यमातून वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरविली. या उपक्रमाच्या माध्यमातून पालखी मार्गावर आरोग्य विभागातर्फे प्रतिबंधात्मक, उपचारात्मक, आरोग्य संदर्भ सेवा देण्यात आली. ५ चित्ररथांच्या माध्यमातून आरोग्य शिक्षण व जनजागृती करण्यासाठी विभागामार्फत नावीन्यपूर्ण व कल्पक पद्धतीने विविध उपक्रम राबविण्यात आले. वारकऱ्यांना पालखी मार्गावर आणि मुक्कामाच्या ठिकाणी मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यासाठी विभागाचे ४,३७६ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ रात्रंदिवस कार्यरत होते.


पालखी मार्गावर वारीमध्ये डॉक्टर, नर्स, आरोग्य सहायक, आशा, आरोग्य सेवक, शिपाई, सफाईगार अशा सर्व कर्मचाऱ्यांनी सेवा दिली. पालखी मार्गावर वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रत्येक पाच किलोमीटर अंतरावर ‘आपला दवाखाना’ तात्पुरता उभारण्यात आला होता. तातडीच्या आरोग्य सेवेसाठी फिरत्या दुचाकी वाहनासह आरोग्यदूत तैनात ठेवण्यात आले होते. आषाढी वारीमध्ये पालखी मार्गावर मोठी गर्दी असल्याने प्रत्येक ठिकाणी अॅम्बुलन्स फिरू शकत नाही, त्यामुळे फिरते दुचाकी आरोग्यदूत प्रथमोपचार पेटीसह सज्ज ठेवण्यात आले होते. त्यांच्या माध्यमातून वारकऱ्यांना तातडीची आरोग्य सेवा पुरविण्यात आली. याशिवाय १०२ व १०८ या क्रमांकाच्या अॅम्बुलन्सही पालखी मार्गावर सेवा देण्यासाठी कार्यरत होत्या. पालखीमध्ये दिंडी प्रमुखांना आरोग्य कीट देण्यात आली होती. याबरोबरच महिलांसाठी प्रत्येक ठिकाणी हिरकणी कक्षाची सुविधा देण्यात आली. पुणे परिमंडळ, पुणे व पुणे जिल्हा परिषद स्तरावरुन २ आरोग्य पथके सुसज्ज रुग्णवाहिकेसह अविरत पालखी परतेपर्यंत होते.


श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी दरम्यान ३,५६,३८९ वारकऱ्यांना, श्री संत तुकाराम महाराज पालखी दरम्यान २,२९,१८३ तर श्री संत सोपानकाका महाराज पालखी दरम्यान १९,३६४ वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरविण्यात आली आहे. मानाच्या इतर पालख्या व दिंड्यांमध्ये ८५,३८६ वारकऱ्यांना आरोग्य सेवा देण्यात आली आहे. पंढरपूर - संस्था व एचबीटी (बूथ) मध्ये ६२,६७० वारकऱ्यांना, पंढरपूर – उपजिल्हा रुग्णालय व ट्रामा आयसीयूमध्ये ८६, ९२२ वारकऱ्यांना तसेच तीन रस्ता शिबिरामध्ये ८३,५९५ वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरविण्यात आली आहे. आरोग्य सेवा पुरविण्यात आलेल्या बाह्यरुग्ण संख्या ९,१८,४९९ तर आंतररुग्ण संख्या ५,०१० अशी एकूण ९,२३,५०९ वारकरी भक्तांना आरोग्य सेवा पुरविण्यात आलेली आहे.

Comments
Add Comment

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात

संक्रांतीच्या उत्सवाला गालबोट; अहिल्यानगर जिल्ह्यात पतंग उडवताना चिमुकल्याचा....

अहिल्यानगर : मकर संक्रांतीच्या दिवशी आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यात एक हृदयद्रावक

मराठी भाषेबाबतचा भाजपाचा दृष्टीकोन व्यापक -प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

विरोधकांची मराठी भाषेबाबतची भूमिका नकारात्मक मुंबई :  भाजपाचे मराठी म्हणजे मराठी व्याकरणातल्या अनेकवचन

ताम्हिणी घाटातील सिक्रेट पॉईंटवर खून आरोपी २४ तासात पोलिसांच्या ताब्यात

माणगाव : ताम्हिणी घाटात सणसवाडी बेडगाव हद्दीत सिक्रेट पॉइंटकडे जाणाऱ्या रस्त्याशेजारी अनोळखी इसमाचा मृतदेह