
ठाणे: पालकांनी आपल्या मुलांना कोणत्याही खासगी किंवा शालेय परवाना नसलेल्या वाहनातून शाळेत पाठवू नये, असे आवाहन कल्याण उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले आहे. ७ जुलै २०२५ रोजी कल्याण-बदलापूर राज्य महामार्गावर घडलेल्या एका गंभीर अपघातानंतर हे आवाहन करण्यात आले आहे.
या अपघातात अंबरनाथ येथील फातिमा हायस्कूलमधील शिशु वर्गातील तीन विद्यार्थी एका भरधाव व्हॅनमधून (MH05FB4792) मागील दरवाजा उघडल्याने खाली पडून गंभीर जखमी झाले. व्हॅन चालकाने बेदरकारपणे आणि निष्काळजीपणाने वाहन चालवल्यामुळे हा अपघात घडला. याप्रकरणी, अंबरनाथ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, खासगी वाहनातून विद्यार्थ्यांची वाहतूक केल्यामुळे मोटार वाहन कायदा, १९८८ नुसार व्हॅनवर दंडात्मक कारवाई करत ती जप्त करण्यात आली आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, कल्याण यांनी सर्व पालकांना त्यांच्या पाल्यांच्या सुरक्षिततेसाठी अधिकृत आणि शालेय परवाना असलेल्या वाहनांचाच वापर करण्याचे आवाहन केले आहे.