मुंबई: OYO हॉटेल्सच्या वाढत्या चैनीचा मुद्दा उपस्थित करत सरकारने याकडे लक्ष द्यावं, असं भाजपचे ज्येष्ठ नेते तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पावसाळी अधिवेशनात म्हंटले आहे. या हॉटेल्ससाठी ग्रामपंचायत, नगर परिषद,महानगरपालिकेची परवानगी घेतली जात नाही, या हॉटेल्समध्ये नेमकं काय चालतं? हा अभ्यासाचा विषय आहे, असं ते पुढे म्हणाले.
महाराष्ट्र विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आयो हॉटेल्सचा मुद्दा उपस्थित केला. मुनगंटीवार म्हणाले की, एकीकडे महाराष्ट्रात अनेक गोष्टी सुरु असताना ओ-वाय-ओ नावाच्या हॉटेल्सची चैन तयार झाली आहे. शहराच्या २०-२० किलोमीटर दूर, निर्जन ठिकाणी हे OYO हॉटेल आहेत. मनात शंका आली की हे हॉटेल्स नेमके काय आहेत? तर ही अतिशय गंभीर बाब असल्याचं लक्षात आलेलं आहे.
मुनगंटीवार पुढे म्हणाले, सरकारने या हॉटेल्सकडे लक्ष द्यावं. या हॉटेलमध्ये एक तासासाठी खोली भाड्याने दिली जाते. ही कशासाठी दिली जाते, हा एक पोलिस विभागाच्या अभ्यासाचा विषय आहे.
संस्कृतीचा ऱ्हास होत असेल तर सरकारने अभ्यास करावा
''ओ-वाय-ओ' च्या माध्यमातून वीस-वीस किलोमीटर कुणीही प्रवाशी जाऊन राहात नाही. एखादा प्रवासी तिथे गेला तर त्याचं अर्थशास्त्र कच्चं आहे, असं समजावं. कारण जाण्या-येण्याच्या टॅक्सीला खूप खर्च येतो. त्या पैशात शहरात चांगली रुम मिळेल.'' असं म्हणत मुनगंटीवार पुढे बोलले की, खरंतर संस्कृती रक्षकांचं सरकार आहे. इथे जर संस्कृतीचा ऱ्हास होत असेल तर सरकारने अभ्यास करावा. गृह राज्यमंत्र्यांनी याची माहिती घ्यावी, अशी मागणी त्यांनी सभागृहात केली.