मोहित सोमण
शेक्सपिअरचे एक वाक्य अत्यंत लोकप्रिय झाले ते होते, नावात काय आहे? किंबहुना आपण याबाबत संदिग्धता बाळगतो, पण स्पष्ट बोलायचे झाल्यास शेअर बाजार अथवा गुंतवणुकीत नावाला महत्त्व प्राप्त झाले आहे. लोक केवळ उत्पादन खरेदी करत नसतात, तर तो विश्वास खरेदी करतात. अशाच एका गुंतवणुकीच्या साधनेत आयपीओला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. झटपट अथवा दिर्घकालीन लाभ मिळवण्यासाठी आपली आयुष्यभराची गंगाजळी संपूर्ण आयपीओत खर्च करणारी लोकं निमशहरी भागात तयार होत आहे.
असे असताना आयपीओ हा बाहुल्यांचा अथवा भातुकलीचा खेळ नाही. कंपन्यांना झटकन भांडवल कमावण्यासाठी गुंतवणूकदारांना तयार केलेली संधी म्हणजे आयपीओ. एखाद्या कंपनीला भांडवल उभारणी करायची असल्यास शेअर बाजारात आपले भागभांडवल हिस्से विकून त्यातून कंपनी भांडवल मिळवते हे सगळ्यांनाच माहीत असेल; परंतु त्यातील विश्वासार्हता किती याचे मोजमाप करणे हे खरे सर्वसामान्यांसमोर आव्हान आहे.
१ ते २ लाख मूल्यांकनाचे शेअर्स खरेदी केले व दीर्घकालीन गुंतवणूक अथवा लघू काळासाठी गुंतवणूक केलेली म्हणजे आपल्याला परतावा मिळाला असा त्याचा अर्थ होत नाही. औद्योगिकरणानंतर भांडवलाच्या गरजा वाढल्या तशाच मध्यमवर्गीय कुटुंबांच्या आशा आकांक्षा पल्लवित झाल्या. केवळ वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी आयपीओत गुंतवणूक करू हा विचार घातक ठरू शकतो.
आयपीओतील गुंतवणूक आपण का करत आहोत, कशासाठी करत आहोत, यातून काय निष्पन्न होणार, किती परतावा मिळणार, धन मिळून यातून किती फलश्रुती होणार, हे जाणून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. आयपीओ सूचीबद्ध करणारी कंपनी कुठली, तिचे उत्पादन कुठले? कंपनीची आर्थिक स्थिती काय? कंपनीचे फंडामेंटल काय टेक्निकल काय? जागतिक स्थिती काय? उत्पादनाची मागणी किती एवढेच नव्हे, तर कंपनीचा प्रवर्तक कोण? त्याची पार्श्वभूमी काय? असे अनेक सवाल गुंतवणूकदारांच्या मनात घोंघावले तरच तो खरा गुंतवणूकदार बनू शकतो.
दरवर्षी कमीत कमी ५० ते ६० आयपीओ बाजारात दाखल होतात. त्यातील बाजारातील अभ्यासानुसार केवळ ९ ते १० आयपीओ यशस्वीपणे सबस्क्राईब होतात. बाकीच्यांचे काय होते? तर अगदी आयपीओ संपल्या संपल्या समभागांची किंमतही वर्षानुवर्षे वसूल होत नाही, तर केवळ भांडवलदारांचा म्हणजेच कंपन्यांचा विकास होतो. यातून विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण होतो. आकर्षक झटपट परतावा अथवा अमर्यादित धनप्राप्ती करणे म्हणजे तो गुंतवणूकदार होत नाही. संयम हा प्रचंड महत्त्वाचा ठरतो.
आयपीओ (प्रारंभिक लिस्टिंग)बद्दल बोलायचे झाले, तर ते कमी कालावधीत पैसे कमवण्यास सोपे असलेल्या उत्पादनांमुळे खूप लोकप्रिय आहेत आणि गुंतवणूकदारांकडून अनेकदा उच्च प्रतिष्ठा असलेल्या स्टॉकसाठी अर्ज येतात. प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे योग्य ठरणार नाही' हे जगातील तत्कालिन सर्वात श्रीमंत व व्यवसायिक गुंतवणूकदार या वॉरेन बफेट असे म्हटले होते.
आयपीओत अभ्यास करून गुंतवणूक केल्यास निवडक आयपीओत विचाराअंती पैसे टाकणे हे शहाणपणाचे लक्षण आहे. उदाहरणार्थ गेल्या आर्थिक वर्षात तथापि, कोल इंडिया, झोमॅटो आणि डीएलएफ सारख्या काही अपवाद वगळता त्यापैकी बहुतेकांनी गुंतवणूकदारांना लिस्टिंग नफ्याच्या बाबतीत निराश केले होते. ज्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ऐतिहासिक आकडेवारीवरून असे दिसून येते की, एलआयसी, पेटीएम (वन ९७ कम्युनिकेशन्स), जीआयसी आरई, एसबीआय कार्ड्स, रिलायन्स पॉवर आणि द न्यू इंडिया ईन्श्युरन्ससारख्या सर्व मोठ्या आयपीओना लिस्टिंगच्या दिवशी तोटा झाला. भारतातील सर्वात मोठा सार्वजनिक इश्यू असलेल्या ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड (एचएमआयएल)च्या ₹२७,८५६ कोटींच्या आयपीओलाही अशाच प्रकारची परिस्थितीचा सामना करावा लागला होता. २०२५ पासून झालेल्या आयपीओतील केवळ ५% आयपीओला गुंतवणूकदारांनी पसंती दिली होती.
एकूणच तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच आयपीओत आपली जमापुंजी गुंतवणे योग्य ठरेल. शेअर बाजारात अशा आजही अनेक प्रकरणे आहेत ज्यामध्ये आयपीओतून मिळणाऱ्या निधीचा विनियोग सांगितलेल्या कामात न करता भलतीकडेच वळवला जातो. यावर सरकार व सेबीही कठोर निर्णय घेत आहे. नुकतंच उदाहरण सांगायचे झाले तर, फर्स्ट ओवरसीज कॅपिटल लिमिटेडचा दाखला देता येईल. ज्यामध्ये गुंतवणुकीवर डल्ला मारत दुसरीकडे वळवली त्यांनतर सेबीने यांना बाजारात प्रतिबंधित केले होते. अशी अनेक उदाहरणे आहेत ही सगळे कारणे लक्षात घेता आयपीओत गुंतवणूक करण्यासाठी सजग गुंतवणूकदार बनणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. प्रथमदर्शनी ते आपले आद्यकर्तव्य असले पाहिजे, यातच शहाणपणा आहे.






