Saturday, July 5, 2025

गुरु ज्ञानाचा सागर

गुरु ज्ञानाचा सागर

मनस्विनी : पूर्णिमा शिंदे


गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु
गुरुर्देवो महेश्वरा
गुरु साक्षात परब्रह्म
तस्मै श्री गुरवे नमः...


आषाढ शुद्ध पौर्णिमेला व्यासपौर्णिमा म्हणतात. आपल्या गुरूंना वंदन करण्याचा दिन. आपल्या भारत देशात रामायण, महाभारत काळापासून गुरू-शिष्य परंपरा चालत आली आहे. ज्यांच्याकडून विद्या प्राप्ती, संस्कार, अर्थार्जन स्वावलंबन, साधना, तपस्या त्या विद्येच्या बळावर आपण स्वतः सह जनो उद्धार करीत असतो. अशा या गुरूंना आदर, सन्मान देणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. भारतीय गुरुपरंपरेत गुरू-शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. जनक याज्ञ वलक्य, शुक्राचार्य जनक, कृष्ण सुदामा सांदिपनी, द्रोणाचार्य अर्जुन अशी गुरू-शिष्य परंपरा आहे. मात्र एकलव्याची गुरूनिष्ठा श्रेष्ठच. श्रीकृष्णांनी तर गुरूंच्या घरी लाकडे वाहिली. संत ज्ञानेश्वरांनी निवृत्तीनाथांनाच गुरू मानले. संत नामदेवांनी विसोबा खेचर यांना गुरू केले. म्हणून गुरू पूजा ही पूजनीय आहे. गुरू बिना ज्ञान कहासे लावू हेच खरे गुरू पायी लीन. झाल्याशिवाय ज्ञान प्राप्ती होऊ शकत नाही आणि वाटही दिसू शकत नाही म्हणून गुरूच्या चरणी लीन होणे
गरजेचे आहे.


गुरू म्हणजे मार्गदर्शक आहे. या सद्गुरूंची गुरुपौर्णिमा म्हणजे प्रकाश, मांगल्य, पावनता गुरू-शिष्याला ज्ञान देऊन अध्ययनाचा अंधार दूर करतो. जो ज्ञानाचा प्रकाश पोहोचवतो. गुरुजी, आचार्य, शिक्षक यांच्याविषयी श्रद्धा आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. साक्षात त्यांना देवासमान मानून तेच आपल्या जीवनाचे शिल्पकार असतात. त्यांना प्रथम वंदन ज्यांच्याकडून विद्याप्राप्ती होते.
नवी दृष्टी लाभते. गुरू हेच वाट दाखविणारे पाठबळ देणारे, प्रसंगी शिक्षा देणारे, चांगली वाईट अशी जाण देणारे आधारस्तंभ. आत्मविश्वास वाढण्यासाठी प्रेरणा, कौतुक, प्रोत्साहनाप्रसंगी कान पकडून दंडशासन, शिक्षा देणारे, पण तितक्याच ममतेने जवळ घेणारे म्हणजे गुरू-माऊलीही. गुरू साक्षात परब्रह्म देवाहून ते भिन्न नाहीत. ते देवाचेच रूप गुरू म्हणजे परमपूज्य परमेश्वर


गुरू ज्ञानाचा सागर
अमृताची खाण
ज्ञानदान दानात श्रेष्ठदान
गुरुराखती विद्येचा मान, करूनी रक्ताचे पाणी
गुरू-शिष्यास बनवि मोत्याचे मनी
म्हणून गुरू मानावे देवा समान
विद्या सरस्वतीचा करू नये अपमान, ती प्रसन्न झाली तरच
जीवनात लाभे शुभ स्थान.
साक्षात दत्तगुरू स्वतः गुरू असून देखील त्यांनी २४ गुरू केले होते. त्याचे ते कारणच आहे.
जो-जो जयाचा घेतला गुण,
तो म्या गुरू केला जाणं.


अवधुतांनी चोवीस गुरू यांचे महत्त्व तीन प्रकारात सांगितले एक सद्गुण अंगी येण्यासाठी गुरू करावा, अवगुण त्यागासाठी गुरू करावे. तीन ज्ञान प्राप्तीसाठी गुरूंच्या ध्यानाचे सेवेचे भावपूजनाचे महत्त्व गुरुचरित्रात अतिशय सुंदर वर्णन आहे. जसे की घडणे, बिघडणे ही गोष्ट महत्त्वाची आहे. त्या-त्या वयामध्ये आपल्यावर कुणाची तरी दृष्टी हवी, सजगपणे अंकुश हवा आणि जिव्हाळा सुद्धा असावा. तसेच ही जी गुरुकृपा आहे गुरू आशीर्वाद आहे तो सन्मार्गाकडे निश्चित घेऊन जातो. स्वार्थ कमी होऊन ऐहिक, ऐच्छिक, भौतिक सुखापेक्षा परमार्थाकडे नेतो. अध्यात्माकडे नेणारा भक्ती भाव आणि त्यासाठी आवश्यक गुरुपूजन, ज्ञानबोध, उपदेश, संदेश, शिकवण, गुरुनिष्ठा यासाठी अनुसंधान महत्त्वाचे आहे.


गुरुविषयी असणारी कृतज्ञता, आत्मीयता, जाणीव, जिव्हाळा, श्रद्धा याची जोड हवी. स्वतःलाच मोठं समजायचं, पण आपल्यापेक्षाही कुणीतरी मोठा आहे मान्य करा आणि तेच गुरू आहेत. गुरू शिवाय पर्याय नाही. स्वतःकडे लघुत्व घेतले की, गुरुत्व आपोआप आपल्याकडे येते. ती दृष्टी जो दाखवतो तो गुरू. ही दृष्टी दाखवण्याचे कार्य करतात साधक. कधीच गुरूंची निंदा करू नये. गुरू ही व्यक्ती नसून चैतन्य शक्ती आहे. आपला संपूर्ण विश्वास आणि श्रद्धेचे स्थान आहे. यासाठी त्यांना प्रसन्न करण्यासाठी आपण त्यांच्यात लीन व्हावे. तरच साधकाला अनुग्रह होतो आणि तेव्हा तो त्याचा दुसरा जन्म असतो.


ज्या-ज्या ठिकाणी मन जाय माझे
त्या-त्या ठिकाणी नीजरूप तुझे
मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी
तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही.


सद्गुरूंचा सहवास सुमधुर असण्यासाठीच. संघर्ष अटळ असला तरी त्यातून आपला बचाव होण्यासाठी गुरूच आपल्याला तारतो. आपल्या आयुष्यात जडणघडणीत प्रगतीमध्ये ज्यांनी ज्यांनी हातभार लावला आणि आपले जीवन सुकर सफल केले त्या सर्व टप्प्याटप्प्यांवर भेटणाऱ्या गुरूंना वंदन करण्याचा आजचा दिवसव्यासपौर्णिमा.

Comments
Add Comment