
ठिबक संच, कृषी यांत्रिकीकरण, शेततळे, सिंचनासाठी पंप अशा विविध योजना राबवून शेतीचे आधुनिकीकरण केले जाईल. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी प्रयत्न केला जाईल. ही माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर येथे बोलताना दिली.
शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करता यावा, म्हणून राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांना बाजारपेठांशी थेट जोडणाऱ्या योजनाही बाजार समित्यांच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत. त्यामुळे शेतमालाला योग्य भाव मिळण्यास मदत होत आहे. गावातील विकास सहकारी संस्थांना बहुउद्देशीय संस्थांमध्ये रूपांतरित करण्याची योजना केंद्र सरकारने तयार केली आहे. या संस्थांना एकूण अठरा प्रकारच्या व्यवसायांची परवानगी दिली जाणार आहे. यामुळे या संस्था शेतकरी आणि बाजारपेठ यांच्यात महत्त्वाचा दुवा ठरणार आहेत. मालाची साठवण, कोल्ड स्टोअरेजची सुविधा, वितरण व्यवस्था मजबूत करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे; असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.