
एजबॅस्टन: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG Test 2 Day 4) यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना एजबॅस्टन मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात चौथ्या दिवसाचा खेळ संपला असून, भारताने इंग्लंडला विजयासाठी ६०८ धावांचे लक्ष्य दिले आहे. ज्याचा पाठलाग करताना इंग्लंडचे तीन बळी मिळवण्यास भारतीय गोलंदाजांना यश आलं आहे.
अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा दुसरा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टन मैदानावर सुरू आहे. या सामन्यात भारताने इंग्लंडला जिंकण्यासाठी ६०८ धावांचे लक्ष्य दिले आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने चौथ्या दिवशी (५ जुलै) खेळ थांबेपर्यंत दुसऱ्या डावात ३ गडी गमावून ७२ धावा केल्या. ऑली पोप २४ धावांवर आणि हॅरी ब्रूक १५ धावांवर नाबाद आहेत. इंग्लंडला जिंकण्यासाठी आणखी ५३६ धावा कराव्या लागतील, तर भारताला जिंकण्यासाठी इंग्लंडचे ७ गडी बाद करावे लागतील.
भारतीय संघाला १८० धावांची आघाडी
भारतीय संघाने त्यांचा दुसरा डाव ६ गडी बाद ४२७ धावांवर घोषित केला. भारताच्या दुसऱ्या डावात शुभमन गिलने १६१ धावा केल्या. सामन्यात भारताने पहिल्या डावात ५८७ धावा केल्या आणि इंग्लंडने पहिल्या डावात ४०७ धावा केल्या. पहिल्या डावाच्या आधारे भारतीय संघाला १८० धावांची आघाडी मिळाली. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली आणि दुसऱ्याच षटकात जॅक क्रॉली शून्यावर विकेट गेली. क्रॉलीला मोहम्मद सिराजने पर्यायी खेळाडू साई सुदर्शनच्या हाती झेलबाद केले. त्यानंतर बेन डकेटला आकाश दीपने धावबाद केले, ज्यामुळे इंग्लंडची धावसंख्या २ विकेटसाठी ३० धावांवर पोहोचली. भारतीय संघासाठी सर्वात मोठे यश आकाश दीपने मिळवले, ज्याने जो रूटला ६ धावांवर बाद केले.
भारताचा दुसरा डाव शुभमन गिल आणि ऋषभ पंतने गाजवला
पहिल्या डावाच्या आधारे १६९ ची मोठी धावांची आघाडी घेतल्यानंतर, भारतीय संघाची दुसऱ्या डावात चांगली सुरुवात झाली नाही. २८ धावा केल्यानंतर यशस्वी जयस्वाल जोश टँगच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू झाला. त्यानंतर तिसऱ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात (४ जुलै) केएल राहुल आणि करुण नायर यांच्यावर भारतीय फलंदाजांची फळी मजबूत ठेवण्याची जबाबदारी आली. त्यानंतर चौथ्या दिवसाच्या खेळात करुण नायरकडून चांगली कामगिरी अपेक्षित होती, परंतु तो २६ धावा काढून बाद झाला. तथापि, सलामीवीर केएल राहुलने आपला उत्कृष्ट फॉर्म सुरू ठेवला आणि ८४ चेंडूत १० चौकारांसह ५५ धावा केल्या. राहुल बाद झाल्यानंतर कर्णधार शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांनी तुफानी फलंदाजी केली. चौथ्या विकेटसाठी दोघांमध्ये ११० धावांची भागीदारी झाली. पंतने फक्त ५८ चेंडूत ६५ धावा केल्या, ज्यामध्ये ८ चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. ऋषभ पंत बाद झाल्यानंतर, शुभमन गिलने रवींद्र जडेजासह डाव पुढे नेला. दुसऱ्या डावातही शुभमन शतक झळकावण्यात यशस्वी झाला. शुभमनने १३० चेंडूत ९ चौकार आणि तीन षटकारांसह आपले शतक पूर्ण केले. शतकानंतरही शुभमनने आपली तुफानी फलंदाजी सुरू ठेवली आणि तो १५० धावांचा टप्पा ओलांडण्यात यशस्वी झाला. दुसरीकडे, जडेजानेही आपला अर्धशतक पूर्ण केळे. बाहेर पडण्यापूर्वी, शुभमनने १६२ चेंडूत १६१ धावा केल्या, ज्यामध्ये १३ चौकार आणि ८ षटकारांचा समावेश होता. रवींद्र जडेजाबद्दल बोलायचे झाले तर, तो ६९ धावांवर नाबाद परतला. जडेजाने ११८ चेंडूंच्या त्याच्या डावात ५ चौकार आणि एक षटकार मारला. जडेजा आणि शुभमन यांच्यात पाचव्या विकेटसाठी १७५ धावांची भागीदारी झाली.