
जम्मू: अमरनाथ यात्रेला निघालेल्या भाविकांवर आज दुर्दैवी प्रसंग ओढवला. जम्मू आणि काश्मीरमधील रामबन जिल्ह्यामध्ये पाच यात्रेकरू बसची एकमेकांवर धडक होऊन तब्बल ३६ जण जखमी झाले आहेत. हा अपघात सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील चंद्रकूटजवळ घडला.
या बस जम्मू भगवती नगरहून दक्षिण काश्मीरमधील पहलगाम बेस कॅम्पकडे जाणाऱ्या ताफ्याचा भाग होत्या. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ताफ्यातील एका बसचा ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात झाला.
नेमकं काय घडलं?
रामबनचे उपायुक्त मोहम्मद अल्यास खान यांनी घटनेची माहिती दिली. ते म्हणाले, "पहलगामच्या ताफ्यातील शेवटच्या वाहनाने अचानक नियंत्रण गमावले आणि ते चंद्रकोट लंगर स्थळी अडकलेल्या इतर वाहनांवर जाऊन आदळले. यामुळे चार वाहनांचे मोठे नुकसान झाले आणि ३६ प्रवासी जखमी झाले."
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी आधीच उपस्थित असलेल्या सरकारी अधिकाऱ्यांनी तात्काळ बचावकार्य सुरू केले. सर्व जखमींना तातडीने रामबन जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सर्व जखमींवर रामबनमध्येच उपचार
जम्मू आणि काश्मीर जिल्हा रुग्णालयातील रामबनचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. मोहम्मद रफी यांनी सांगितले की, "अमरनाथ यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या एका बसची दुसऱ्या बसशी टक्कर झाली. एकूण ३६ जखमी रुग्ण आमच्याकडे उपचारासाठी आले होते. सर्व रुग्णांवर येथेच उपचार करण्यात आले असून, कोणालाही इतर रुग्णालयात पाठवण्याची गरज भासली नाही."
या अपघातामुळे अमरनाथ यात्रेकरूंमध्ये काही प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले असले तरी, जखमींना तात्काळ मदत मिळाल्याने मोठा अनर्थ टळला आहे.