
विजेच्या अघोषित भारनियमनाने बदलापूरकर हैराण
बदलापूर : बदलापूर शहराचा विकास झपाट्याने होत आहे. चौथी मुंबई म्हणून बदलापूरकडे पाहिले जात असले तरी, शहराला पाणी आणि वीजपुरवठ्याच्या समस्यांसह इतर ही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. डोळ्यांसमोर पाणी असूनही घागर रिकामीच असते, हे वास्तव आहे. पाणी आणि वीज यावर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर भव्य हंडा कळशी आणि जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
बदलापूर पश्चिम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा ते जीवन प्राधिकरणाच्या बेलवली येथील कार्यालयापर्यंत हा भव्य मोर्चा काढण्यात आला. बदलापुरात मागील अनेक दिवसांपासून नियमितपणे पाण्याची टंचाई जाणवते. शहराची पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी पुरेसा पाणीपुरवठा होत नाही.
त्यामुळे, लोकांना अनेकवेळा पाण्यावाचून त्रास सहन करावा लागतो. अनियमित आणि कमी दाबाने होणारा पाणी पुरवठा,ठिकठिकाणी होणारा गढूळ पाणी पुरवठा याचा निषेध करण्यासाठी भव्य हंडा - कळशी तर कोणतीही पूर्व सूचना न देता वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, काही ठिकाणी डीम लाईट असणे, वीज अधिकारी फोन न उचलणे,सतत फोन बिझी असणे आणि कधी फोन उचलला तर उडवाउडवीची उत्तरे देणे याचा निषेध करण्यासाठी भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी श्रीधर पाटील, तुकाराम म्हात्रे, अविनाश मोरे, बाळाराम कांबरी, चेतन धुळे, मनोहर आंबवणे, तसेच महिला आणि पुरुष पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिसांकडून पत्रकारांना शिष्टमंडळाच्या सोबत जाण्यासाठी मज्जाव करण्यात आला.
आश्वासने पूर्ण नाही केली तर गावाला पाठवू - वामन म्हात्रे
शिवसेना बदलापूर शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, शुक्रवार पर्यंत वीज पुरवठा सुरळीत होणार आहे. एका महिन्याच्या आत एक कोटीचा निधी मंजूर करून जनरेटर देणार असून आश्वासन पूर्ण केले नाही तर सबंधित अधिकाऱ्याला घरी पाठवू इशारा दिला आहे.