
एजबेस्टन: भारत आणि इंग्लंड यांच्यात बर्मिंगहॅमच्या एजबेस्टनमध्ये दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. शुक्रवारी सामन्याचा तिसरा दिवस आहे. इंग्लंडचा पहिला डाव ४०७ धावांवर आटोपला. सिराजने ६ विकेट मिळवल्या तर आकाशदीपला ४ विकेट मिळवता आल्या. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला असून दिवसअखेर भारताकडे २४४ धावांची आघाडी आहे.
भारताने तिसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात १ बाद ६४ धावा केल्या आहेत. सलामीवीर यशस्वी जायसवाल २८ धावा करून बाद झाला. तर केएल राहुल २८ आणि करूण नायर ७ धावांवर खेळत आहे.
याआधी मोहम्मद सिराजने तिसऱ्या दिवसाची सुरूवात धमाकेदार केली. आपल्या खात्यात पहिल्याच षटकांत त्याने ज्यो रूट आणि कर्णधार बेन स्टोक्सला बाद केले. दरम्यान, त्याला हॅटट्रिक घेता आली नाही. यानंतर स्मिथ आणि ब्रूकने कमालीची फलंदाजी केली. दोघांमध्ये ३००हून अधिक धावांची भागीदारी झाली. मात्र ब्रूक बाद होताच इंग्लंडचा डाव कोसळला.
याआधी भारतीय संघाने पहिल्या डावात शुभमन गिलच्या द्विशतकाच्या जोरावर ५८७ धावा केल्या होत्या. इंग्लंड १८० धावांनी पिछाडीवर आहे.
असा होता इंग्लंडचा डाव
इंग्लंड संघाची पहिल्या डावाची सुरूवात काही खास झाली नाही. १३ धावांवर त्यांना सलग दोन धक्के बसले. आकाशदीपने गेल्या सामन्यातील शतकवीर बेन डकेट आणि ओली पोप यांना शून्यावर बाद केले. तर जॅक क्राऊलीही काही खास करू शकला नाही. त्याने १९ धावा केल्या आणि तो सिराजच्या हाती बाद झाला. तिसऱ्या दिवसाची सुरूवात धमाकेदार झाली. सिराजने पहिल्याच षटकात जो रूट आणि बेन स्टोक्स यांना माघारी धाडले. स्टोक्सला खातेही खोलता आले नाही. रूटने २२ धावा केल्या होत्या.